रविवार, ५ जुलै, २००९

आयुष्यावर बोलू काही

दूरचित्रवाहिन्यांचे आक्रमण आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रसारामुळे मराठी वाचन संस्कृती लोप पावत चालली असल्याची ओरड नेहमीच करण्यात येते. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी सध्याची पिढी आणि आयटी/कॉलसेंटर प्रोफेशनमध्ये असणाऱया तरुणांमध्ये काही अपवाद वगळता मराठी वाचन मग ते मराठी वृ्त्तपत्रांचे किंवा पुस्तकांचे एकूणच कमी झालेले आहे. मराठी वाचनच जेथे कमी झाले आहे, अशा परिस्थितीत कविता वाचन/ कविता सादरीकरणाच्या कार्यक्रमाला रसिकांचा आणि त्यातही विशेषत महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि युवकांचा प्रतिसाद मिळणे तशी दूरचीच गोष्ट. पण डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी त्यांच्या आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम अमाप लोकप्रिय करून आजच्या पिढीला,युवकांना आणि विद्यार्थ्यांनाही मराठी कविता आवडतात हे सिद्ध करून दाखवले आहे.

हे दोघे सादर करत असलेल्या आयुष्यावर बोलू काही या मराठी कवितांच्या कार्यक्रमाचा पाचशेंवा भाग नुकताच पुण्यात साजरा झाला. संदीप खरेच्या कविता आणि सलील कुलकर्णी यांचे संगीत आणि साथीला तबल्यावरचा एक सहकारी असा कोणतेही अवडंबर नसलेला हा कविता सादरीकरणाचा कार्यक्रम. संदीप खरे यांचे साधे व सोपे आणि मनाचा ठाव घेणारे शब्द व मनात घर करुन राहणारी, सहज गुणगुणायला लावणारी सलील कुलकर्णी यांची चाल, संदीप व सलील यांचा रंगमंचावरील सहज वापर, घरातल्याच नातेवाईकांशी किंवा मित्रांशी गप्पा मारावी, अशी समोरच्याला आपलेसे करण्याची सहज शैली यामुळे हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. हा कार्यक्रम पाच, दहा वेळा पाहणारेही रसिक आहेत, हे दिसून आले. कविता सादर करणे या साध्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला आणि अवघ्या सहा वर्षांत त्याने लोकप्रियतेचा कळस गाठला.


या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्व गाणी समोर बसलेल्या प्रेक्षकांना अगदी तोंडपाठ झालेली आहेत. व्यासपीठावर संदीप किंवा सलील गाणे म्हणतांना त्यांच्याबरोबर रसिक प्रेक्षकही मनातल्या मनात किंवा ओठांनी पुटपुटत ही गाणी त्यांच्याबरोबर म्हणत असतो. यात महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि युवक जसे असतात, तसे पन्नाशी पार केलेली रसिक मंडळीही असतात. कार्यक्रमातील प्रत्येक गाणे ह प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. अरे हे तर आपल्याही मनात आहे, असे कुठेतरी समोरच्याला वाटते, आणि तो त्या कार्यक्रमात समरस होऊन जातो. व्यासपीठावरही कोणतीही भपकेबाज सजावट नसते किंवा वादक व त्यांच्या वाद्यांचा सुळसुळाट नसतो. हार्मोनियमवर स्वत सलील कुलकर्णी ल तबल्यावर त्यांचा एक सहकारी आणि निवेदकाच्या भूमिकेत संदीप खऱे असतात. अर्थात निवेदन खऱे यांचे असले तरी अधूनमधून सलील कुलकर्णीही त्यात आपल्या हजरजबावी वक्तव्याने भर घालत असतात.

या कार्यक्रमाचा विक्रम म्हणजे पहिल्यांदा पुण्यात आणि नंतर डोंबिवलीत आयुष्यावर बोलू काहीचे सलग सहा तासांचे दोन महाप्रयोग सादर झाले आहेत. असे भाग्य क्वचितच अन्य कोणत्या कार्यक्रमाला मिळाले असेल. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमातील कविता, गाणी यांच्या कॅसेट्स व सीडीही निघाल्या असून त्यांचीही चांगल्या प्रमाणात विक्री झाली आहे. अनेकांनी वाढदिवस व अन्य निमित्ताने आयुष्यावर बोलू काही तसेच या दोघांच्या मन तळ्यात, अग्गोबाई ढग्गोबाई या सीडी व कॅसेट् भेट म्हणून दिल्या आहेत.

मराठी कविता लोकप्रिय करण्याचे आणि कवितांच्या कार्यक्रमाकडे विद्यार्थी आणि युवकांना मोठ्या प्रमाणात वळवण्याचे काम सलील कुलकर्णी व संदीप खरे यांनी केले आहे.

शनिवार, ४ जुलै, २००९

समुद्राच्या लाटांपासून वीजनिर्मिती

वीजेची निर्मिती आणि वितरण हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत जाणार असून या प्रश्नावर वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात आणि त्या तुलनेत वीजेची निर्मिती होत नसल्याने (मुंबई वगळता) संपूर्ण महाराष्ट्रात सक्तीने वीज भारनियमन करावे लागत आहे. हिवाळा किंवा पावसाळा सुरु झाला की त्यात काही प्रमाणात सवलत देण्यात येते, मात्र तो काही कायमचा उपाय नाही. वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन वीज निर्मितीचे नवे प्रकल्प उभारणे आवश्यक आहे, सुदैवाने आपल्याला भरपूर सूर्यप्रकाश व सागरी किनारा लाभलेला आहे. या दोन्हींपासून मोठ्या प्रमाणात वीजेची निर्मिती करता येणे शक्य आहे. समुद्राच्या पाण्यात छोटेसे यंत्र टाकून वीज निर्मिती करण्याचा यशस्वी प्रयोग रत्नागिरी जिल्ह्यातील व दापोली तालुक्यातील कोळथरे येथे केला गेला आहे.


महाराष्ट्र राज्य शासनाचे महान्यूज नावाचे एक स्वतंत्र संकेतस्थळ असून या संकेतस्थळावर तारांकित या सदरात या प्रयोगाची सचित्र माहिती देण्यात आली आहे. जिज्ञासूना http://mahanews.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन याविषयी सविस्तर माहिती घेता येऊ शकेल.


आपल्याकडील पारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्र राज्याला ७२० कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला असून या किनारपट्टी क्षेत्रातून अंदाजे ५०० मे.वॅ. इतकी वीजनिर्मिती करण्यास वाव असल्याने तज्ज्ञांचे मत आहे. त्यादृष्टिने विविध स्तरावर प्रयत्नदेखील करण्यात येत आहेत. अशाच प्रयत्नातून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कोळथरे येथे समुद्री लाटांवरील वीज निर्मिती प्रकल्प उभा राहिला आहे.

नवी मुंबईतील खारघर येथील सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेज व सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग-तंत्रनिकेतन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभा राहिला आहे. वाहत्या वार्‍याचा समुद्राच्या पाण्यावर दाब पडल्यामुळे समुद्रात लाटा निर्माण होतात. या लाटांची लांबी व उंची ही तेथील वातावरणावर अवलंबून असते. त्यात गतीज व स्थितीज अशी दोन प्रकारची ऊर्जा साठलेली असते. ही दोन्ही प्रकारची ऊर्जा संयुक्तरित्या साधारणपणे पाच किलोवॅट इतकी असते.


'अनिश' असे नाव असलेला हा प्रकल्प दीड किलो वॅट वीजनिर्मिती क्षमतेचा आहे. कोळथरे येथे समुद्रकिनारी एका अल्टरनेटला चक्र जोडून त्याला दोरखंडाच्या आधारे पाण्यात फ्लोट सोडण्यात आला आहे. समुद्रीलाटांमुळे हा फ्लोट काही अंतर पुढे गेल्यामुळे चक्र फिरते. यातून अल्टरनेटर व जनरेटर कार्यान्वित होतात. लाट ओसरताच फ्लोट मागे खेचला जातो व चक्र पुन्हा फिरते. अशा प्रकारे फ्लोट पुढे मागे होत राहतो व चक्र फिरत राहते. यातूनच वीजनिर्मिती केली जाते. अशा प्रकारची ऊर्जानिर्मिती प्रदुषणमुक्त असून ही सर्व यंत्रणा उभारण्यासाठी साधारणत: ६०-६५ हजार रुपये खर्च येतो. शिवाय अशा एका प्रकल्पातून तीन घरांना वीजपुरवठा होईल इतकी वीज निर्मिती करणे शक्य होत आहे.

कोळथरे येथील या प्रकल्पापासून प्रेरणा घेऊन किनारपट्टी लाभलेल्या ठिकाणी असे तसेच राज्यात ठिकठिकाणी अपारंपरिक ऊर्जेचा उपयोग करून वीज निर्मिती प्रकल्पही मोठ्या संख्येने उभे राहिले पाहिजेत. किनारपट्टी असलेल्या ठिकाणी समुद्राच्या लाटांपासून तर राज्यात अन्यत्र सौरऊर्जा व वाऱयापासून (पवनचक्की) वीज निर्माण केली पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला पाहिजेच परंतु त्याचबरोबर मोठमोठे उद्योजक, व्यावसायिक, कॉर्पोरेट कंपन्या, दानशूर व्यक्ती, विविध स्वयंसेवी संस्था यांनी पुढे आले पाहिजे. अर्थात सौरऊर्जा किंवा अशा प्रकल्पांसाठी येणारा खर्च हा खूप मोठा आहे. राज्य शासनानेही त्यासाठी सवलत दिली पाहिजे, प्रकल्पासाठी लागणारे साहित्य अत्यल्प किंमतीत उपलब्ध करून दिले पाहिजे.


केंद्र शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे http://mnes.nic.in/ या नावाचे तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचेही http://www.mahaurja.com/ असे संकेतस्थळ असून या दोन्ही संकेतस्थळांवर याची माहिती मिळू शकेल. विनय कोरे हे
महाराष्ट्र राज्याचे अपारंपरिक ऊर्जामंत्री आहेत. त्यांचा ई-मेल min_horticulture@maharashtra.gov.in असा आहे.

संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८८६०९३/२२८८६१८८

शुक्रवार, ३ जुलै, २००९

विकृतीला मान्यता

प्रौढ व्यक्ती परस्परांच्या संमतीने समलिंगी संबंध ठेवू शकतात आणि असे संबंध ठेवणे कायदेशीर आहे, असा दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला निकाल देशभरात नवा वाद, चर्चा निर्माण करणारा ठरला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर समलिंगी संबंध ठेवणाऱया व्यक्ती आणि समलिंगी संबंधांचे समर्थन करणाऱया संस्थांनी त्याचे स्वागत केले आहे, तर सर्वसामान्य माणसांकडून त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भातील कायदा संसदेत जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत या प्रकरणी दिलेला निकाल हा राखून ठेवण्यात येत असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. माझ्या मते न्यायालयाने दिलेला हा निकाल म्हणजे विकृतीला दिलेले कायद्याचे अधिष्ठान आहे. आता कायद्यामुळे समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता दिली गेली आहे, पण ते देशाच्या भावी पिढीसाठी अत्यंत अयोग्य व घातक आहे.


भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ अन्वये असे संबंध ठेवणे हा फौजदारी गुन्हा ठरविण्यात आला आहे. आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा संबंधाना मान्यता मिळणार आहे. परस्पर संमतीने सज्ञान व्यक्तींनी समलिंगी संबंध ठेवले तर तो आता गुन्हा ठरणार नाही. मात्र परस्पर संमतीखेरीज असे संबंध राखणाऱयांवर तसेच अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणाऱयांच्या विरोधात यापुढेही या कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुळात जी बाब अनैसर्गिक आहे, तिला कायद्याच्या चौकटीत बसविण्याची काय गरज आहे. भारतीय संस्कृतीत तर अशा गोष्टी अनैतिक, निषीद्ध मानल्या गेल्या आहेत. परदेशातून असे संबंध ठेवले जातात, तिकडे त्याला मान्यता आहे, मग आपल्याकडे का नको, असाच जर या मागे उद्देश असेल तर ते केवळ चुकीचे नाही तर भावी पिढीसाठी घातक ठरु शकेल. आज समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली तर अशा अन्य काही अनैतिक, अनैसर्गिक गोष्टींना मान्यता मिळावी, म्हणून कोणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावतील. मग यापुढे अशा सर्व गोष्टींना आपण कायदेशीर मान्यता देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


मुळात निसर्गाने किंवा परमेश्वराने मानवाला जन्माला घालताना स्त्री आणि पुरुष असा भेद करुनच पाठवले आहे. निसर्गाचे काही नियम असतात. त्यात माणसाने ढवळाढवळ केली की काय होते ते आपण सध्या ढासळते पर्यावरण, लहरी झालेला पाऊस, ग्लोबल वॉर्मिंगचा धोका, वाढते प्रदूषण आणि अन्य काही गोष्टींच्या स्वरुपात पाहतो आहोतच. स्त्री आणि पुरुषाच्या शरीर संबंधातून नवा जीव जन्माला येणे हा निसर्गाचा नियम आहे. गेली हजारो वर्षे हे चक्र सुरु आहे. त्यात कोणी कधी ढवळाढवळ केली नव्हती आणि यापुढेही ती कोणी करु नये, असे वाटते. लहान वयातून पौगंडावस्थेत आल्यानंतर भिन्नलिंगीय व्यक्तीविषयी आकर्षण वाटणे ही सहज व सुलभ भावना आहे. त्यात गैर व चुकीचे नाही. मात्र त्या वयात योग्य संस्कार आणि मार्गदर्शन मिळाले नाही तर मुले/मुली भरकटण्याची शक्यता असते. त्यासाठी त्या वयात मुलांवर योग्य संस्कार आणि मार्गदर्शन मिळण्याची गरज असते. मुलगा व मुलगी योग्य वयाचे झाल्यानंतर त्यांचा विवाह करून देऊन त्यांना शरीरसंबध ठेवण्यास एक प्रकारे समाजाने लग्न या संस्थेद्वारे मान्यता दिलेली आहे.गेली हजारो वर्षानुवर्षे हे सुरु आहे.


अर्थात आता आपल्याकडेही लग्नापूर्वी संबंध ठेवणे, शालेय वयातच सेक्सचा अनुभव घेणे यात काही चुकीचे नाही, असा एक गैरसमज वाढत चालला आहे. आपली संस्कृती विसरुन आपण परदेशातील भोगवादी, चंगळवादी संस्कृतीच्या कह्यात जात चाललो आहोत. आपले ते सर्व मागासलेले आणि टाकाऊ व इंग्लंड, अमेरिका व परदेशातील ते सर्व चांगले अशी भावना वाढीस लागली आहे आणि ते अत्यंत घातक आहे. समलिंगी संबंध हा विषय काही मुठभर मंडळी सोडली तर बहुसंख्य लोकांच्या दृष्टीने निषीद्ध व अनैतिक आहे. या संदर्भातील मराठी वृत्तपत्रात आज ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यात वापरलेल्या छायाचित्रावरुन ही बाब समाजहिताची नाही, अनैतिक आहे, हे स्पष्ट होते. कारण बहुतेक वृत्तपत्रांनी या बातमीत हातात हात घेतलेल्या दोघांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. म्हणजे हे चुकीचे असून समाजमान्य नाही, अनैतिक आहे, त्यामुळे या विषयाची छायाचित्रे छापणे, त्याला प्रसिद्धी देणे चुकीचे आहे, हे तारतम्य वृत्तपत्रांनी बाळगले आहे. म्हणजेच जी गोष्ट चुकीची आहे, अनैतिक व अनैसर्गिक आहे, ज्याला समाजाची मान्यता नाही, त्याला कायद्याच्या चौकटीत बसविण्याचा हा खटाटोप कशासाठी चालला आहे.


समलिंगी संबंध ठेवणारी आज काही मुठभर मंडळी आहेत. त्यांची एकूण टक्केवारी कमी आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे तसेच इंटरनेटच्या वाढत्या आक्रमणामुळे सध्या नको त्या वयातच लहान मुलांना सर्व काही कळू लागले आहे. नको त्या वयात लैगिगतेचा अनुभव घेता येतो आहे किंवा पोर्नोग्राफी साईट्स, ब्लु फिल्मच्याद्वारे सेक्सचे वेगवेगळे प्रकार पाहता येत आहेत. या सगळ्याचे अत्यंत वाईट व घातक परिणाम भावी पिढीवर, कोवळ्या वयातील मुलांवर होत आहेत. त्यात आता समलिंगी संबंधाना मिळालेल्या कायदेशीर मान्यतेने आणखी भर पडणार आहे. आत्तापर्यंत जे संबंध अनैतिक होते, तो फौजदारी गुन्हा होता, असे संबंध एक विकृती असून त्याला समाजमान्यता नाही हे माहित होते, आता ते करायला कायदेशीर मान्यता मिळाली आहे, ते चुकीचे नाही असे भावी पिढीच्या मनावर बिंबवले जाईल. त्यामुळे भविष्यात समलिंगी संबंध ठेवणाऱयांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली, तर त्यातून विचित्र सामाजिक परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे संबंध ठेवणारी जोडपी वाढली तर नवी पिढी कशी निर्माण होईल, केवळ क्षणभर आनंदासाठी आपण आपली संस्कृती, नितिमत्ता व मूल्ये विसरणार का, सगळीच जोडपी समलिंगी संबंध ठेवणारीच तयार झाली तर आणखी काही वर्षांनी देशात काय भयानक परिस्थिती निर्माण होईल, त्याचा आपण सर्वानीच गंभीरपणे विचार केला पाहिजे.

गुरुवार, २ जुलै, २००९

वाद नामकरणाचा

वांद्रे-वरळी सागरी सेतुचे उदघाटन नुकतेच झाले आणि आता या सेतुच्या नामकरणावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सेतुला राजीव गांधी यांचे नाव द्यावे, असा सूचनावजा आदेश दिला आणि मम म्हणत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्याला तात्काळ मान्यता दिली. पुलाच्या घाईगर्दीत झालेल्या या नामकरणास शिवसेना-भाजपने विरोध केला असून या सेतुला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात राजीव गांधी यांच्यापेक्षा वेगळे नाव सुचले नाही का, महाराष्ट्रातील अन्य नावे का नाही दिली, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. काही वर्षांपूर्वी राजीव गांधी यांनी पवार यांना कॉंग्रेस पक्षात प्रवेश दिला होता, त्याची तर ही परतफेड नाही ना, अशी टिकाही ठाकरे यांनी केली आहे. खऱें तर या नामकऱणावरुन वाद होणार हे माहिती असतानाही पवार यांनी राजीव गांधी याचे नाव देण्याची सूचना का केली आणि मुख्यमंत्री चव्हाण यांनीही ती तातडीने अंमलाता का आणली की त्यांनाही आपण किती स्वामीनिष्ठ आहोत, ते दाखवून द्याचचे होते.


देशाच्या स्वातंत्र्यासाठी केवळ गांघी व नेहरु कुटुंबियांनीच योगदान दिले, त्यात हौतात्म्य पत्करलेले असंख्य क्रांतिकारक आणि अन्य देशभक्तांचे काहीच योगदान नाही का, प्रत्येक रस्ता, चौक, कॉलेज, विमानतळ किंवा अशा मोठ्या प्रकल्पाला महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचीच नावे दिली पाहिजेत, असा काही लेखी नियम आहे की संसदेत तसा कायदा मंजूर करुन घेण्यात आला आहे. या सेतूला राजीव गांधी यांचे नाव देण्याची खरोखरच काही गरज होती का, आता त्याच्या समर्थनासाठी राजीव गांधी यांचा जन्म मुंबईत गिरगाव येथे झाला, असे लंगडे समर्थन करण्यात येत आहे. पण त्यात काही अर्थ नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पानिपत झाले. दोन अंकी संख्येइतकेही खासदार पवार यांना निवडून आणता आले नाहीत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. विलासराव देशमुख व अन्य काही मंडळी या निवडणुका कॉंग्रेसने स्वबळावर लढवाव्या, अस सांगत आहेत. लोकसभा निवडणुकीत पवार यांना व त्यांच्या पक्षाला मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिल्यामुळे पवार यांना राज्यात पक्षाचे अस्तीत्व टिकविण्यासाठी आणि सत्तेत राहण्याकरता कॉंग्रेसबरोबर आघाडी करणे फायद्याचे ठरणार आहे. त्यासाठी या कार्यक्रमातच त्यांनी राजीव गांधी यांचे नाव देण्याची राजकीय गुगली टाकली व त्यात ते यशस्वी झाले.


मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रकरणी राज्यातील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करुन त्यात हा विषय चर्चेसाठी ठेवायला हवा होता. पवार यांनी राजीव गांधी यांचे नाव सुचवले तरी, मुख्यमंत्र्यांनी त्यावर विचार करुन नंतर निर्णय घ्यायला हवा होता. राजीव गांधी यांच्याऐवजी दुसरे कोणते नाव (स्वातंत्र्यवीर सावरकर) असते तर अशी तत्परता त्यांनी दाखवली असती का, हा प्रश्न आहेच. उत्तर आहे अर्थातच नाही. सर्वांच्या सहमतीने पुलाचे नामकरण झाले असते तर वाद निर्माण झाला नसता. आणि जर नावावरुन एकमत झाले नसते तर कोणत्याही मोठ्या पुढाऱयाचे, नेत्याचे नाव देण्याऐवजी वांद्रे-वरळी सागरी सेतु असे नाव दिले असते तरी काहीही बिघडले नसते. खरे तर या सागरी सेतूला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमारातील सरदार सरखेल कान्होजी आंग्रे किंवा अन्य कोणा प्रमुखाचे नाव देणे अधिक योग्य ठरले असते. शिवसेना-भाजपने या सेतुला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली होती, तीही योग्य होती. किंवा भगवान परशुराम, अगस्ती ऋषी यांचेही नाव दिले असते तरी ते समर्पक ठरले असते. कारण ही सर्व नावे सागराशी संबंधित होती.


आता आणखी काही दिवस सेतूच्या नामकरणावरुन वाद सुरु राहील. पुन्हा काही दिवस जातील. आणखी एखादा नवा प्रकल्प तयार होईल. त्यावेळी कदाचित सत्तेवर शिवसेना-भाजप यांचे सरकार आले तर त्यांनी दिलेल्या नावाला तेव्हाचे विरोधक म्हणजे कॉंग्रेसवाले विरोध करतील. वर्षानुवर्षे हे असेच सुरु आहे. आपण यातून कधी शिकणार, सारासार विचार व सदसदविवेक बुद्धीचा वापर कधी करणार की राजकारणी आणि याचे काही वावडे आहे...

बुधवार, १ जुलै, २००९

खजिना रानफुलांचा


वर्षा ऋतूमध्ये अर्थात आपल्या पावसाळ्यात निसर्गाचे रुप अत्यंत मनोहारी आणि मंत्रमुग्ध करणारे असते. निसर्गाने मुक्त हस्ताने विविध रंगांची उधळण करून विविध झाडे, झुडपे, फुले यांचा खजिनाच आपल्यासमोर उधळलेला असतो. पावसाळ्यातील निसर्गाची ही उधळण पाहून मन वेडे होऊन जाते. पावसाळ्यात भटकंती करणाऱे ट्रेकर्स आणि पिकनिक करणाऱया मंडळींसाठी निसर्गाचे हे मनमोहक रुप पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते. या भ्रमंतीमध्ये विविध रंगांची, आकारांची अनेक फुले, झाडे पाहायला मिळतात. ही लहान-लहान फुलझाडे अत्यंत सुंदर असतात. यातील काही फक्त पावसाळ्यातच उगवणारी असतात. भ्रमंती करत असताना ही फुले आपण पाहतो, त्यांचे फोटो काढतो आणि नंतर त्यांना विसरुनही जातो. काही वेळेस त्यांची नावेही आपल्याला माहिती नसतात.



अशा या फुलांची सचित्र माहिती देणारी आदित्य धारप यांची नाममहात्म्य (अशी फुलं, अशी नावं) ही लेखमालिका लोकसत्ताच्या रविवार वृत्तान्तमध्ये (२८ जुलै २००९) सुरु झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात सह्य़कडय़ाच्या कपारीत असंख्य रानफुलं फुलतात. आणि याच सह्य़पर्वताच्या छत्रछायेत भटकंती करीत वाढलेले फुलवेडे वारकरी कुठल्यातरी अनामिक आनंदाच्या अपेक्षेने या ओल्या अनवट वाटा तुडवत फुलं शोधत हिंडतात. आणि तो सह्य़ाद्री नावाचा प्रेमळ आजोबा अजिबात निराश करत नाही. या रानफुलांची विविधता तरी किती! असंख्य आकार, असंख्य रंग, असंख्य रंगछटा आणि बरोबरीने सरळ सोप्यापासून अति क्लिष्टपर्यंत असंख्य रचना. या रानफुलांबाबत एक मात्र खरं की या रानफुलांचं बारसं करणारी ‘नावं’ मात्र अज्ञातच राहतात, असे आदित्य यांनी लेखाच्या सुरुवातीला म्हटले आहे.


मराठीमध्ये एकाच फुलाची असंख्य नावं होतात. ज्याला जे फूल जसं भासतं त्याप्रमाणे ती व्यक्ती ते नाव देते. म्हणजे कोणी एखाद्या झाडाला त्याची फुलं बघून नाव देईल. तर आणखी कोणी त्याच झाडाची पानं बघून वेगळं नाव देईल. तर कधी असंही होतं की एकाच फुलात कोणाला एक आकार दिसतो आणि कोणाला आणखी वेगळाच! एका गोष्टीबद्दल खेद वाटतो. आपली ही मराठी मातीतली अस्सल नावं देणाऱ्या असंख्य गावकऱ्यांची, धनगरांची, आदिवासींची, रानफुलांच्या वेडाने झपाटलेल्या फुलवेडय़ांची नावं मात्र गुलदस्त्यातच राहतात. मग या स्थानिक नावांचं महत्त्व काय? एक तर ही नावं आपल्या मायमराठीतली. आपण नीट पाहिल्यास असं लक्षात येईल की या रानफुलांच्या रंग, आकार, रूपाप्रमाणेच ही नावंही तितकीच सुंदर आहेत. वैशिष्टय़पूर्ण पावसाळी रानफुलांचं आणि नावांचं कोडकौतुक करावं म्हणून हे ।। नाममाहात्म्य ।।
अशीच काही सुंदर फुलं आणि त्यांच सुंदर नावं आपण ‘अशी फुलं अशी नावं..’ या सदरातून पाहणार, असल्याची माहिती आदित्य धारप यांनी दिली आहे.

निसर्ग आणि भ्रमंतीची आवड असणाऱयांना रानफुलांच्या या खजिन्याची ही सचित्र माहिती नक्की आवडेल, असे वाटते.


संपर्कासाठी आदित्य धारप यांचा ई-मेल

adittyadharap@yahoo.com