शनिवार, ६ जून, २००९

सावध ऐका पुढल्या हाका...

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा लावून धरलेला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात जे हिंदी भाषिकांचे जे आक्रमण होत आहे, त्याच्या विरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.काही वर्षांपूर्वी शिवसेनेने मराठीचाच मुद्दा घेत मुंबई व महाराष्ट्रात आपले बस्तान बसवले होते. मात्र गेल्या काही वर्षात शिवसेनेने मराठीचा मुद्दा सोडून दिला आणि तोच मुद्दा राज ठाकरे यांनी उचलला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी ठिकाणी उमेदवार उभे केले होते. मनसेचा कोणीही उमेदवार निवडून आला नाही, परंतू त्यांनी लाखोंनी मते मात्र घेतली. मनसेची सुप्त लाट मतदानातून प्रकर्षाने दिसून आली. महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच राज्य विधिमंडळात सादर करण्यात आला. त्यातून मुंबई व महाराष्ट्रातील मराठी टक्का घसरला असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. म्हणजे राज ठाकरे यांनी ज्या मराठीच्या व परप्रांतीयांच्या आक्रमणावरून आवाज उठवला, त्याला या अहवालाने दुजोराच दिला आहे.


गेल्या तीस वर्षांत राज्यातील मराठी माणसांची टक्केवारी ७.७ टक्क्यांनी घटली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत १२ लाख ३९ हजार लोकांनी इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतर केल्याची माहितीही यात देण्यात आली आहे. महाराष्ट्रात १९७१ मध्ये मराठी मातृभाषा असणाऱया्ची संख्या ७६.५ टक्के इतकी होती. २००१ मध्ये ती ६८.८ टक्क्यांपर्यंत घटली आहे. हिंदी मातृभाषा असणाऱयांचे प्रमाण तीस वर्षांपूर्वी पाच टक्के होते, ते आता ११ टक्के झाले आहे. उर्दू भाषिकांचे प्रमाण ७.३ टक्क्यांवरून ७.१ टक्के तर गुजराथी भाषिकांचे प्रमाण २.८ टक्क्यांवरून २.४ टक्के इतके झाले आहे. अन्य भाषिकांचे प्रमाण ८.४ टक्क्यांवरून १०.७ टक्के इतके झाले आहे.


गेल्या पाच वर्षांत जे १२ लाख ३९ हजार परप्रांतीय महाराष्ट्रात स्थायिक झाले आहेत, त्यात सर्वात जास्त संख्या उत्तर प्रदेशातील लोकांची आहे. उत्तर प्रदेशातून गेल्या पाच वर्षांत ४ लाख २३ हजार लोक महाराष्ट्रात आले आहेत. अन्य राज्यातून आलेल्या नागरिकांची संख्या अशी आहे.
कर्नाटक-१ लाख ३५ हजार, गुजराथ-१ लाख १९ हजार, राजस्थान-८२ हजार, बिहार-५१ हजार, पश्चिम बंगाल-४९ हजार, केरळ-४१ हजार, आंध्र प्रदेश-३२ हजार.


हा पाहणी अहवाल धक्कादाय़क असून आता तरी महाराष्ट्र शासनाने या बाबतीत कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र ही काही धर्मशाळा नाही. मुळात मुंबई किंवा महाराष्ट्रात आले की मराठी भाषा येत नसली तरी चालते. कुठेही आणि कसेही पोट भरण्यापुरते पैसे मिळवता येतात, हे परप्रांतीयांना समजून चुकले आहे. अन्य राज्यात जशी स्थानिक भाषा ही सर्व ठिकाणी सक्तीची केलेली असते, तसे आपल्याकडेन नाही. मराठी भाषा ही शाळा किंवा महाविद्यालयातून सक्तीची करण्यात आलेली नाही. इंग्रजी किंवा अन्य भाषिकांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत, त्यांचा मराठी भाषा सक्तीची करण्यास ठाम विरोध आहे. जर अन्य राज्यात स्थानिक भाषेची सक्ती केली जाऊ शकते तर महाराष्ट्रात ते का होऊ शकत नाही. कारण आपल्या येथील राज्यकर्त्यांना मुळातच तशी राजकीय इच्छाशक्ती व मराठीची आच नाही. मराठीला कोणी विरोध केला ती आपले राज्यकर्ते त्यांच्यापुढे नांगी टाकून मोकळे होतात. त्यामुळे मराठी भाषा येत नसली तरी आपले काहीही अडत नाही हे या परप्रांतीयांना समजून चुकले आहे. त्याचाच ते गैरफायदा घेत आहेत.


मराठी भाषा ही आलीच पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही, मराठी भाषा लिहितास वाचता आणि बोलता आली नाही तर आपले अडते आहे, काहीच करता येत नाही, असे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत परप्रांतीय येथे असेच येत राहतील. अनेक खासगी आस्थापने, कार्यालये येथे मराठीची गळचेपी केली जाते. मोबाईल कंपन्यांचे कस्टमर केअर सेंटर येथे मराठीतून बोलले तर उत्तरे मिळत नाहीत, दोन मराठी माणसेही एकमेकांशी हिंदीत किंवा इंग्रजीत बोलतात. मुळात मराठी भाषा, संस्कृती या विषयीचा अभिमान, वारसा आपण विसरत चाललो आहोत. आपले स्वत्व पुन्हा एकदा जागृत करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे नुकताच जो आर्थिक पाहणी आहवाल सादर झाला आहे, तो सर्व मराठी माणसे, सत्ताधारी आणि विरोधकांसाठी डोळ्यांत अंजन घालणारा आहे. त्यातून आपण काही शिकलो तरच पुढे मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राला भवितव्य आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून आणि १०५ हुतात्म्यांच्या बलीदानाने व संघर्ष करून मुंबईसह हे महाराष्ट्र राज्य आपण मिळवले आहे.


केंद्रातील सत्ताधाऱयांना मुंबई ही महाराष्ट्रपासून वेगळी करून केंद्रशासित करायची आहेच. भविष्यात मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी टक्का आणखी घसरला तर मुंबई केंद्रशासित करण्यासाठीचे जे समर्थक आहेत, त्यांच्या हातात आयतेच कोलीत मिळेल. आपण सगळ्यानीच जागरुक राहिले पाहिजे. त्यामुळे सावध ऐका पुढल्या हाका...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा