रविवार, २१ जून, २००९

आला आला वारा संगे पावसाच्या धारा.

अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या माणसांना शनिवारी झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने जरा दिलासा मिळाला. मुंबईत मात्र त्याने फक्त वातावरण निर्मिती केली. पण ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि राज्याच्या अन्य भागात मात्र त्याने काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरुपात आपली हजेरी लावली. दोन दिवसात मान्सून मुंबईसह राज्यात सक्रिय होणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यांचा हा अंदाज खरा ठरो आणि काल आलेला हा पाऊस राज्यात चांगला मुक्कामाला राहो, अशी आशा आहे.


पाऊस सुरु झाल्यानंतर सृष्टीचे सर्व रंगरूपच बदलून जाते. उन्हाळ्यात तप्त झालेली धरणी पावसाच्या पहिल्या धारांनी म्हाऊन निघते आणि मन धुंद करणारा मातीचा गंध सर्वत्र दरवळू लागतो. जसजसा पाऊस चढू लागतो, तसतसे आजूबाजूचे सर्व वातावरण हिरवेगार होऊन जाते. हा हिरवा निसर्ग मन मोहून टाकतो, मनाला उत्साह-आनंद देतो. मराठी साहित्य. भावगीते. चित्रपटगीते यातूनही या पावसाचे वर्णन करणारी खूप गाणी आहेत. यापैकी अनेक गाणी लोकप्रिय असून पाऊस सुरु झाली की ही गाणी आपल्या मनात रुंजी घालायला सुरुवात करतात. आपल्याला ती गाणी आठवून आपण ती अगदी सहज गुणगुणायला लागतो.


मराठी साहित्य, भावगीते आणि चित्रपटगीतांमधून आलेला हा पाऊस वेगवेगळी रुपे घेऊन आलेला आहे. कधी तो हळूवारपणे तर कधी धिंगाणा घालत येतो. कधी तो पावसाच्या आठवणींनी आपले मन धुंद करतो तर कधी हाच पाऊस आपले मन व्याकुळ करतो. हाच पाऊस प्रियकर-प्रेयसीला हवाहवासा वाटतो तर कधी हाच पाऊस त्यांना विरहाचे चटके देतो. कधी हाच पाऊस बडबड गाणी होऊन लहान मुलांची गाणी बनून येतो.


पाऊस म्हटला की पटकन ओठावर येते ते देवबाप्पा चित्रपटातील
नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच
हे गाणे. आज इतकी वर्षे झाली तरी हे गाणे आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय आहे. मराठी वाद्यवृदामध्ये आजही हे गाणे हमखास वन्समोअर घेते. साधे-सोपे शब्द आणि सहज गुणगुणता येईल अशी चाल व आशा भोसले यांच्या आवाजाने हे गाणे फक्त लहान मुलांचे न राहता मोठ्यांचेही झाले.


सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय

हे असेच एक पावसाचे लोकप्रिय बालगीत. या बरोबरच पटकन आठवणारी पावसाची आणखी बालगीते म्हणजे

ए आई मला पावसात जाऊ दे, एकदा तरी चिंब चिंब होऊ दे

किंवा

टप टप टप काय बाहेर वाजताय ते पाहू

चल ग आई, चल ग आई पावसात जाऊ

ही दोन बालगीते आठवतात.


चित्रपटातील पाऊस गाण्यांविषयी बोलताना पटकन आठवणारे एक लोकप्रिय गाणे म्हणजे वरदक्षिणा चित्रपटातील

घनघन माला नभी दाटल्या कोसळती धारा


मन्ना डे यांनी गायलेले हे गाणे अद्याप लोकप्रिय असून मराठी वाद्यवृंदात आजही हे गाणे नेहमी गायले जाते.

हा खेळ सावल्यांचा य़ा चित्रपटातील

आला आला वारा संगे पावसाच्या धारा

पाठवणी करा सया निघाल्या सासुरा

हे सुद्धा गाणे पाऊस गाणे म्हणून माहितीचे आहे.

अहो राया मला पावसात नेऊ नका,

ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना

घन ओथंबून येती, मनात राघू फुलती,

वादळ वारं सुटलय गो ,

चिंब पावसांन रान झालं आबादानी

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांनी अजरामर केलेले

रिमिझम झरती श्रावणधारा, धरतीच्या कलशात

ही सुद्धा अशीच पावसाची काही लोकप्रिय गाणी.

कवयित्री इंदिरा संत यांची

नको नको रे पावसा

असा धिंगाणा अवेळी

घर माझे चंद्रमौळी

अन दारात सायली


ही कविता

किंवा त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांची
श्रावण मासी हर्ष मानसी

हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सरसर

क्षणात हिरवे उन पडे

या कविताही सहज आठवणाऱया.


अशी आणखीही अनेक पाऊस गाणी आहेत व असतील. मला सहज आठवली तेवढी मी येथे दिली. अनेक गाणी राहिलीही असतील. ती तूम्ही मनात आठवून आलेल्या या पावसाचे मनापासून स्वागत करा...

1 टिप्पणी: