मंगळवार, १६ जून, २००९

ही तर सणसणीत चपराक...

नाशिकचे पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांच्या जाहीर केलेल्या बदलीला अखेर राज्य शासनाने स्धगिती दिली आहे. सर्वसामान्य आणि विविध क्षेत्रातील नाशिककरांनी मिश्रा यांच्या बदलीच्या विरोधात रस्त्यावर उतरून आपला तीव्र संताप प्रकट केला होता. अखेर राज्य शासनाला त्याची दखल घेऊन या बदलीला स्थगिती देणे भाग पडले. स्वच्छ आणि प्रामाणिक अधिकाऱयांच्या पाठीशी उभे राहून नाशिककरांनी एक चांगला पायंडा पाडला आहे. अशा प्रकारे अन्यत्र एखाद्या चांगल्या, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱयांची बदली झाली तर तेथेही नाशिकचाच कित्ता गिरवला गेला पाहिजे. लोकांच्या रेट्यामुळे आणि संघटीत जनशक्तीमुळे केलेली बदली स्थगित करायला लागणे म्हणजे राज्य शासनाला लगावण्यात आलेली सणसणीत चपराक आहे. किमान आता तरी राजकारणी मंडळी यातून काही शिकतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.


नाशिक पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मिश्रा यांनी कोणाच्याही दबावाला आणि दडपणाला भीक न घालता आपले काम कर्तव्यदक्षपणे केले. पोलिसांचे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, असे जे ब्रीदवाक्य आहे, त्याच्याशी ते प्राणाणिक राहिले. सर्वपक्षीय गुंडांना त्यांनी तडीपारीच्या नोटीसा बजावल्या. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पुढारी म्हणून वावरणाऱया व्हाईट कॉलर गुंडांसहित अवैध धंदे व व्यवसाय करणाऱया गुन्हेगारानाही, त्यांनी त्यांची जागा दाखवून दिली. एखादा सनदी किंवा पोलीस अधिकारी आपले काम प्रामाणिकपणे करतो, लोकांच्या भल्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा राबवतो, तेव्हा तो लोकांच्या गळ्यातील ताईत बनतो. मात्र असे अधिकारी मंत्री, राजकीय नेते यांना नकोसे असतात. मग मंत्री, नेते आणि त्यांच्या ताटाखालची मांजरे असलेली मंडळी अशा प्रामाणिक, स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱयांची बदली करतात किंवा त्यांना बढती देऊन अन्यत्र पाठवतात. त्यामुळे आपल्या मर्जीतील आणि हाजी हाजी कऱणारा अन्य एखादा अधिकारी त्या जागी त्यांना आणून बसवता येतो.


मिश्रा यांच्या बदलीबाबतही तसेच घडले. मिश्रा यांनी सुरु केलेल्या धडक कारवाईमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे, मंत्र्यांचे धाबे दणाणले. मग मिश्रा यांनीच बदली करण्याबाबत विनंती केली होती, असे नाशिकचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी बेधडक सांगितले. मात्र त्यावर मिश्रा यांनी तातडीने आपण अशी कोणतीही विनंती केली नसल्याचे सांगून भुजबळ यांचे दात त्यांच्याच घशात घातले. उलट केंद्र शासनाच्या प्रतिनियुक्तीवर किमान पाच वर्षे आपल्याला पाठवताच येणार नाही, असेही त्यांनी सांगून टाकले. इकडे सर्वसामान्य नाशिककरांबरोबरच व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, काही राजकीय पक्ष हे या बदलीच्या विरोधात रस्त्यावर उतरले. गेल्या काही दिवसांपासून विविध गुंड टोळ्यांनी नाशिकमध्ये हैदोस घातला होता. या टोळ्यांचे म्होरके कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित असल्याने पोलीस यंत्रणा त्यांना हात लावायला घाबरत होती. त्यामुळे लुटालूट, खंडणी, छेडछाड यांना उत आला होता. दोन महिन्यांपूर्वी नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून आलेल्या मिश्रा यांनी याच्या विरोधात कठोर पावले उचलली आणि सर्वसामान्य नाशिककरांना दिलासा दिला.


मुळात ही बदली का करण्यात आली, असा प्रश्न निर्माण होतो. कदाचित मिश्रा यांची बदली केल्यामुळे जो जनक्षोभ उसळला आणि त्यांच्या समर्थनार्थ सर्वसामान्य नाशिकरांसह विविध क्षेत्रातील लोक एकत्र आले आणि रस्त्यावर उतरले, त्याची कल्पना राजकारणी व गृहमंत्री जयंत पाटील यांना तेव्हा आली नसेल. बदली तर केली, काय होणार आहे, अशा थाटात उपमुख्यमंत्री भुजबळ वावरत होते. मात्र संघटित जनशक्तीचा रेटा असा काही लागला की मिश्रा यांनीच बदली करण्याबाबत विनंती केली होती, असे सांगणाऱया भुजबळ यांनाच ही बदली स्थगित करावी, अशी विनंती गृहमंत्री जयंत पाटील यांना करावी लागली. मात्र मिश्रा यांच्या सारख्या प्रामाणिक आणि कर्तव्यतत्पर अधिकाऱयांची कोणाच्या तरी सांगण्यावरून बदली करण्यापूर्वी जयंत पाटील यांनी काही सारारार विचार का केला नाही, बदली प्रकरण त्यांनी इतक्या सहज का घेतले.


अगोदरच गुंडांचा पक्ष म्हणून आपल्या पक्षाची जनमानसात प्रतिमा तयार होत आहे, त्यात मिश्रा यांची बदली केली तर त्याला खतपाणीच मिळेल, असा साधा विचारही जयंत पाटील यांच्या मनात आला नाही का, की मिश्रा यांची बदली केली जावी, म्हणून त्यांच्यावर कोणी दबाव आणला होता, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी जयंत पाटील व भुजभल यांची जाहीर कानउघाडणी का केली नाही, की त्यांचाही या बदलीस मुक पाठिंबा होता, अशा प्रकारे जर कोणी सनदी किंवा पोलीस अधिकारी काम करत असेल, तर ती त्याची चूक आहे का, की त्याने असे काम करुच नये, केवळ मंत्री, राजकारणी यांची हाजीहाजी करत आपल्या ताटाखालचे मांजर व्हावे, अशी अपेक्षा शरद पवार, भुजबळ व जयंत पाटील यांची आहे का, असे अनेक प्रश्न यातून निर्माण होत आहेत.



जोशीपुराणवर दोनच दिवसांपूर्वी मी विनाशकाले विपरितबुद्धी या लेखाद्वारे हा विषय मांडला होता. त्यात मी म्हटलेही होते की जनक्षोभाच्या रेट्यामुळे राज्य शासनाला ही बदली रद्द करावी लागली, तशी नामुष्की त्यांच्यावर आली तरी ही निर्लज्ज मंडळी पुन्हा तोंड वर करून त्याचेही समर्थन करतील आणि लोकांच्या विनंतीचा व मताचा आदर करत आम्ही ही बदली रद्द करत आहोत,असे निर्लज्जपणे सांगतील. या प्रकरणी तसेच झाले. गृहमंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत मिश्रा यांच्या बदलीला तात्पुरती स्घगिती देत असल्याची घोषणा केली. मात्र ती करताना नाशिकच्या जनतेचे मी अभिनंदन करतो, भुजबळ व आमदार शोभा बच्छाव यांनी ही बदली स्थगित करण्याची विनंती केली होती. त्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे.
म्हणजे पडलो तरी यांचे नाक वर, माकड म्हणते माझीच....तसा प्रकार आहे.


असो. पण झाले हे चांगले झाले. जनशक्तीच्या रेट्यापुढे शासनाला झुकावे लागले आणि अगोदर केलेली बदली स्थगित करण्याची नामुष्की गृहमंत्र्यांवर आली. हे उदाहरण म्हणजे सत्तेचा माज चढलेले राज्य शासन, मंत्री, राजकारणी आणि सर्वपक्षीय राजकारण्यांसाठी डोळ्यातील झणझणीत अंजन ठरावे आणि यापुढे कोणत्याच राजकीय पक्षाच्या शासनाला असे करण्याची दुर्बुद्धी होऊ नये आण तशी ती झाली तर जनशक्तीचा सोटा त्यांच्या टाळक्यात बसल्याखेरीज राहणार नाही, हेच या घटनेने दाखवून दिले आहे. त्यासाठी नाशिककरांचे अभिनंदन...

४ टिप्पण्या:

  1. जोशिबुवा खुपच घाण उपसता बुवा तुम्ही.

    उत्तर द्याहटवा
  2. कालच आई सांगत होती ह्याबद्दल. नाशिककरांनी मारलेली ही चपराक सही आहेच शिवाय एकजूट जनशक्तीही दाखवली. गिरे तोभी तंगडी उपर...हाहा...हा... नाशिककरांचे अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  3. अनामित,
    नमस्कार
    आपण आपली ओळख दिली असती तर बरे वाटले असते. मी घाण उपसतो म्हणजे काय ते ही स्पष्ट केले असते तर चांगले झाले असते. मी लिहिलेल्या लेखाशी आपण सहमत नाही की असे सडेतोड लिहिणे आपल्याला पटले नाही. असो.
    शेखर

    उत्तर द्याहटवा
  4. भानसा
    नमस्कार
    आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. अन्यायाच्या विरोधात जनशक्ती एकवटली तर काय होऊ शकते,त्याचे हे उदाहरण आहे. नाशिककरांचा कित्ता अन्य ठिकाणीही गिरवला गेला पाहिजे.
    शेखर

    उत्तर द्याहटवा