बुधवार, १० जून, २००९

निर्लज्जम सदासुखी...

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, खासदार पद्मसिंह पाटील यांची पाठराखण करण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसने ठरवले आहे. पद्मसिंह हे पक्षाचे ज्येष्ठ, सन्माननीय आणि प्रामाणिक सदस्य असल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांनी नवी दिल्ली येथे सांगितले असल्याच्या बातम्या आज वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या आहेत. पद्मसिंह यांच्याबाबतीत पक्षाने घेतलेली ही भूमिका म्हणजे निर्लज्जम सदासुखी अशा प्रकाची आहे.


न्यायालययात जो पर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला गुन्हेगार किंवा दोषी मानू नये, हे कायद्याच्या दृष्टीने योग्य असले तरी तात्वीक व नैतिक दृष्ट्या ते अयोग्य आहे. विशेषत सार्वजनिक जीवनात वावरणाऱया, राजकारणात असणाऱया आणि मंत्रीपद, आमदार, खासदार, नगरसेवक अशा लोकप्रतिनिधींसाठी तर ते क्षम्य नाहीच. खरे तर पक्षाने पाठराखण करण्यापूर्वीच पद्मसिंह यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगून आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा होता. त्यांनी तो दिला नाही तर पक्षप्रमुख म्हणून शरद पवार यांनी पद्मसिंह यांना तो देण्यास भाग पाडायला हवे होते. पण पवार यांनीही कठोर भूमिका घेतली नाही.


मूळात पवार या व्ययक्तीविषयी सर्वसामान्य जनमानसात चांगले मत नाही. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण पवारानीच सुरु केले, असे सर्वसामान्य लोकांचे म्हणणे आहे. उल्हासनगर येथील पप्पू कलानी, वसईतील हितेंद्र ठाकूर ही पवार यांच्याच आशीर्वादाने पुढे आलेली आणि राजकारणात प्रतिष्ठा मिळवलेली मंडळी. याच पवारांच्या विमानातून कुख्यात दाऊद इब्राहिमच्या दोन साथीदारांनी केलेला प्रवास लोक विसरलेले नाहीत. पवार म्हणजे धूर्त, कावेबाज, पातळयंत्री आणि अशा प्रकारच्या अनेक रसायनांचे मिश्रण असल्याचे लोक मानतात. त्यांच्याबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनात विश्वासार्हता अजिबात राहिलेली नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पवार यांच्या पक्षाला खासदारांची दोन अंकी संख्याही गाठता आली नाही आणि हे महाशय पंतप्रधान होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. पवार आपल्याच पक्षातील अन्य नेत्यांना जो न्याय लावतात, तो पद्मसिंह यांना का लावत नाहीत, ते पवार यांचे निकटचे नातेवाईक आहेत, म्हणून त्यांना सर्व गुन्हे माफ आहेत का, अशी शंका मनात येण्यास जागा आहे.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी तर पद्मसिंह यांच्यासाररखी माणसे खऱे तर कायमच तुरुंगात असायला हवीत, ही माणसे पाकिस्तानी दहशतवाद्यांपेक्षा अधिक धोकादायक असल्याची सडेतोड टिका केली आहे.


आता या प्रश्नावरती सर्वपक्षीय राजकारणी पद्मसिंह, पवार आणि त्यांच्या पक्षावरती तुटून पडले आहेत. परंतु त्यांच्या त्यांच्या पक्षात काय आहे, असे जर त्यांच्या एखाद्या नेत्याच्या बाबतीत घडले असते, तर त्यांनी काय केले असते, असे प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात येत आहेत. पद्मसिंह यांच्या रुपाने सर्व विरोधकांना एक आयते कोलीत मिळाले आहे. अन्य पक्षांच्या नेत्यांच्या बाबतीत अशा प्रकारची उदाहरणे घडली तेव्हा काय झाले, हे सहज आठवले तरी लक्षात येईल. अर्थात हे सांगणे म्हणजे पद्मसिंह किंवा पवार यांचे समर्थन करणे नाही, तर सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते किती खालच्या पातळीला जाऊ शकतात, त्यांचे हात किती बरबटलेले आहेत, एखादे प्रकरण आपल्या पक्षावर किंवा नेत्यावर शेकले की कशी सारवासारव केली जाते, मी किती स्वच्छ आणि प्रामाणिक आहे, हे कसे दाखवून दिले जाते, त्याची केवळ आठवण करून देण्यासाठीच हे लिहिले आहे. या मंडळींचे एक बरे असते. अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे किंवा नेते जो पर्यंत आपल्या पक्षात नसतात तो पर्यंत ते गुन्हेगार असतात. ते आपल्या पक्षात आले की पवित्र होतात, अशा थाटात सर्वपक्षीय नेते वागत असतात.


तर प्रश्न असा आहे की पवार हे पद्मसिंह यांची पाठराखण का करत आहेत. आपली आणि आपल्या पक्षाची जनमानसातील प्रतिमा चांगली नाही, हे माहिती असूनही पवार पद्मसिंह यांन पाठीशी का घालत आहेत, पद्मसिंह यांच्या जागी पक्षाचा दुसरा कोणी नेता असता, तर त्याचीही अशीच पाठराखण आणि संरक्षण पवारांनी केले असते का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपिस्थत होत आहेत. झी टीव्हीच्या कार्यालयावर हल्ला झाल्याचा नैतिक ठपका ठेवून पवार यांनी तेव्हाचे राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा राजीनामा घेतला होताच ना तसेच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणीही उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनाही राजीनामा द्यायला लावला होताच ना, मग आत्ताच हत्येसारखा गंभीर आरोप पद्मसिंह यांच्यावर असताना त्यांची पाठराखण का करण्यात येत आहे. खरे तर पद्मसिंह यांना सीबीआयने अटक केल्यानंतर तातडीने त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यायला लावणे आवश्यक होते, तसे झाले असते तर चांगला संदेश लोकांमध्ये गेला असता. न्यायालयात ते निर्दोष ठरले असते तर पुन्हा त्यांना संधी देता आली असती. पण पवारांनी ती संधी घालवली.


मुळात पद्मसिंह यांना अटक झाली असली तरी न्यायालयात त्यांना शिक्षा होईल, यावर सर्वसामान्य लोकांचा विश्वास नाही. आजवर कोणत्या बड्या राजकारण्याला अशा प्रकारे शिक्षा झालेली आहे, ही सर्व मंडळी सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर काहीही करू शकतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. खऱे तर अशा लोकांना मतदारांनी योग्य धडा शिकवण्याची गरज आहे. अशी मंडळी मग ती कोणत्याही पक्षातील असो, निवडणुकीला मग ती नगरसेवक, आमदार किंवा खासदार आदी पदांसाठी उभी राहिली तरी त्यांना पाडायचेच, असे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. पण म्हणतात ना, राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर गेंड्याची कातडी आणि निर्लज्ज असायला पाहिजे. जो असा असतो, तोच राजकारणात यशस्वी होऊ शकतो. राजकीय नेते सर्वसामान्य मतदारांना गृहीत धरतात, मतदार आणि सर्वसामान्य नागरिक चार-सहा महिन्यांत सर्व काही विसरुन जातील, असा त्यांचा ठाम विश्वास असतो आणि त्याच बळावर हवे ते करायला आणि करून सवरुन निर्लज्जासारखे मिरवायलाही ते पुढे असतात.


गेल्या काही वर्षांत अशा घटना वारंवार घडत आहेत. सत्ता आणि संपत्तीचा माज चढलेल्या या सर्वपक्षीय राजकाऱण्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. शेवटी लोकांच्या सहनशीलतेलाही काही मर्यादा असतात. राजकारणी मंडळी वेळीच शहाणी झाली नाहीत आणि लोकांची सहनशक्ती संपली तर एक दिवस या राजकारण्यांना उघडे-नागडे करून भर रस्त्यात व चौकात लोक बडवायला कमी करणार नाहीत आणि सध्याचे दिवस पाहता ती गोष्ट दूर नाही...

५ टिप्पण्या:

  1. aapalyaashee samvad sadhayachi icchha aahe
    mail id dyal ka?
    turtas majha mail ID-
    vinayakpachalag@gmail.com

    उत्तर द्याहटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. ya post vishayi hi comment nahi.

    About madhe aapla email ID dilat tar vachak contact karu shakatil.

    apratim lekhan ahe. asech chalu rahave.

    उत्तर द्याहटवा
  4. विनायक, सुदर्शन
    नमस्कार
    आपल्या सूचनेबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर मी माझा ई-मेल आयडी दिला आहे.
    शेखर

    उत्तर द्याहटवा
  5. Best Oculus Quest 2 headset for 2021 - Tatian
    Oculus Quest 2 nipple piercing jewelry titanium headset for everquest: titanium edition 2021 – Features, titanium camping cookware Pros and Cons of Using Virtual Reality to suunto 9 baro titanium Exercise · The Oculus Quest 2 remains one of titanium mountain bikes the best all-around

    उत्तर द्याहटवा