रविवार, १४ जून, २००९

विनाशकाले विपरीत बुद्धी

राजकारणी म्हटले की वकीलांसारखे खऱयाचे खोटे आणि खोट्याचे खरे नेहमीच करावे लागते. आपले चुकले असले तरी चूक कबुल करायची नाही, घोळवत घोळवत काहीतरी कारणे सांगत राहायचे, त्या विषयावरुन लोकांचे लक्ष भलत्याच विषयाकडे वळवायचे, यात ही मंडळी तरबेज असतात. राजकारणी मंडळींना- मंत्र्यांना किंवा खरेतर कोणत्याही क्षेत्रातील उच्चपदस्थांना आपले काम प्रामाणिकपणे करणारी, कर्तव्यतत्पर आणि स्पष्टवक्त्या स्वभावाची माणसे नको असतात. भारतीय प्रशासकीय किंवा पोलीस सेवेत एखादा अधिकारी जर हुषार, प्रामाणिक, पैसे न खाणारा, वरिष्ठांची हाजी-हाजी न करणारा, स्वत भ्रष्टाचार न करणारा व दुसऱयांनाही करु न देणारा, अवैध धंदे व व्यवसाय यांना पाठीशी न घालणारा असा कोणी अधिकारी असेल तर तो फार दिवस त्या पदावर टिकत नाही, असे आपल्याला नेहमीच दिसून येते.


अशी प्रामाणिक व स्वच्छ कारभार करणारे अधिकारी राजकारण्यांनाही नकोसे होतात. त्यांना असे अधिकारी म्हणजे आपल्या मार्गातील कटकट व अडथळा वाटत असतो. त्यामुळे मग काही ना काही कारणाने किंवा निमित्ताने त्यांची बदली केली जाते. असाच अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत. त्या संदर्भातील बातम्या आजच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. नाशिकमधून गुंडाना तडीपार करणारे नाशिकचे पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांचीच राज्य शासनाने नाशिकमधून हकालपट्टी केली आहे. काही दिवसांपूर्वीच आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता गुंडांच्याविरोधात थेट कारवाई सुरु केली होती. नाशिक शहरात निर्माण झालेले गुंडाराज संपविण्यासाठी त्यांनी अनेक ठोस उपाय केले होते. गुंडांच्या विरोधात तडीपारी, मोक्का या सारखे कडक उपाय हाती घेतले होते. त्यामुळे नाराज झालेल्या राजकारण्यांकडून विशेषत सत्ताधारी मंडळींकडून त्यांच्या बदलीसाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. राजकीय पक्षांच्या आड लपणाऱया गुंडांना तडीपार करणऱया मिश्रा यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात आल्यामुळे गुंड व सत्ताधाऱयांनी आपल्या पद्धतीने मिश्रा यांचा अडथळा दूर केल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नाशिककरांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.


या संदर्भात काल एका मराठी वृत्तवाहिनीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया दाखवण्यात आली. मिश्रा यांनीच विनंती केल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. प्रत्यक्षात आपण अशी कोणतीही विनंती केली नसल्याचे मिश्रा यांचे म्हणणे आहे. नाशिकमधील सर्वसामान्य जनमत मिश्रा यांच्या बाजूने आहे. मिश्रा यांच्या बदलीच्या विरोधात काही संघटना, राजकीय पक्ष आणि लोकांनी तीव्र आंदोलन करायचे ठरवले आहे. त्यामुळे कदाचित सत्ताधाऱयांना त्यांची बदली रद्दही करावी लागेल. जनमताची भावना लक्षात घेऊन आम्ही ही बदली रद्द करत असल्याचेही निर्लज्जपणे राज्य शासनाकडून सांगण्यात येईल. खरे तर सध्याचा काळ हा राष्ट्रवादी पक्षासाठी प्रतिकूल आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी सीबीआयने राष्ट्रवादीचे बडे नेते, माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांना अटक केली आहे. पाटील यांना ज्या दिवशी अटक केली तेव्हाच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येऊन खासदारकीचा राजीनामा द्यायला भाग पाडायला हवे होते. राष्ट्रवादी म्हणजे गुंडांचा पक्ष ही प्रतिमा जनमानसात तयार होत आहे आणि राज्यात याच पक्षाकडे गृहमंत्रीपद आहे.


आत्ताचे जे गृहमंत्री आहेत, त्यांच्यापूर्वीही गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच होते. पद्मसिंह पाटील प्रकरणी त्यांनी नरमाईची भूमिका घेतली असल्याचा आरोप करण्यात येत आहेच. त्यामुळे खरे तर या प्रकरणात गृहमंत्री जयंत पाटील यांनी मिश्रा यांच्या बदलीबाबत
कोणाचाही दबाव आला असला तरी त्यापुढे झुकायला नको होते. ज्या कोणी मिश्रा यांची बदली करण्यासाठी सांगितले असले, त्यांना ठामपणे त्यांची बदली केली जाणार नाही, असे सुनवायला हवे होते. अर्थात ज्या पक्षाच्या उच्च नेत्यानेच राजकारणाचे गुन्हेगारीकरण व गुन्हेगारीचे राजकारण सुरु केले, गुन्हेगारांना निवडणुकीत उमेदवारी देऊन त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली, ज्याच्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात पाताळयंत्री, धूर्त, कावेबाज आणि काडीचीही विश्वासार्हता नसलेला अशी प्रतिमा ज्या पक्षाच्या प्रमुखाबद्दल आहे, त्या राष्ट्रवादी साहेबांच्या चेल्यांकडून वेगळी अपेक्षा तरी काय करणार.


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांना दोन अंकी संख्येइतकेही खासदार निवडून आणता आले नाहीत, ते पंतप्रधान होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. निवडणुकीतील या पराभवापासून तसेच पद्मसिंह पाटील प्रकरणातून तरी राष्ट्रवादीचे हे साहेब काही धडा घेतील, असे वाटत होते. पण मिश्रा यांच्या बदली प्रकरणावरून त्यांनी असा कोणताही धडा घेतला नसल्याचे दिसून येत आहे. खरे तर मिश्रा यांच्या अशा झालेल्या बदलीप्रकरणी राष्ट्रवादीच्या या साहेबांनी संबंधितांचे व गृहमंत्री जयंत पाटील यांचे कान उपटायला हवे् होते. पण या प्रकरणी त्यांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. राष्ट्रवादीचे हे साहेब, त्यांचे गृहमंत्री व पक्षासाठी मिश्रा यांची केलेली बदली म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी आहे, असेच म्हणावे लागेल आणि त्याची फळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला नक्कीच भोगावी लागतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा