शनिवार, २० जून, २००९

अखेर पाऊस आला...

गेल्या काही महिन्यांपासून अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्याने सर्वजण हैराण झाले होते. कधी एकदा पाऊस सुरु होतोय, त्याकडे सगळे डोळे लावून बसल होते. जून महिन्याची १८/१९ तारीख उलटून गेली तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे आता कधी एकदाचा पाऊस येतोय, असे झाले होते. ऐला चक्रीवादळामुळे यंदाच्या वर्षी लवकर दाखल झालेला पाऊस पुढे सक्रीय झालाच नाही. महाराष्ट्रातही पाऊस रत्नागिरीपर्यंत येऊन पोहोचला होता. मात्र तो पुढे सरकत नव्हता. मात्र अखेर आज त्याने आपला रुसवा सोडला आणि मुंबईसह ठाणे परिसरात त्यांने आपली हजेरी लावली. आजच्याच वृत्तपत्रातून येत्या ४८ तासात मान्सून मुंबई व कोकणात दाखल होईल, असे वेधशाळेचे म्हणणे असल्याच्या बातम्या आल्या आहेत.


आजची त्याची हजेरी आणि दिवसभरातील ढगाळ वातावरण, अधूनमधून होणारी पावसाची रिमझिम पाहता, आता पाऊस अगदी नक्की आला असे म्हणायला हरकत नाही. फक्त आता त्याने कुठेही न रेंगाळता वाजत, गाजत आणि गर्जत आपली हजेरी लावावी, अशी अपेक्षा त्रस्त झालेल्या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. खरेच जवळपास पाच महिन्यांपासून उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आणि विशेषत शेतकऱयांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊसच न आल्यामुळे केलेली पेरणी वाया जाण्याची वेळ येऊन ठेपली होती. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.


माणसाचे मन मोठे विचित्र असते नाही, उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या आपणाला कधी एकदा पाऊस सुरु होतोय, याची ओढ लागलेली असते. मात्र तो सुरु झाल्यानंतर त्यांने आपले रौद्र रूप दाखवून दाणादाणा उडवून दिली, सगळीकडे पाणी, चिखल करून टाकला आणि पावसाचे कॅलेंडरवरील महिने संपत आल्यानंतरही त्याचा मुक्काम राहिला तर आपण वैतागतो. पावसाला शिव्या घालतो. आता पुरे कर असे म्हणतो. पावासाळ्यानंतर आपल्याला ओढ लागते ती थंडीची. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यापासून थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. पण गेल्या वर्षी थंडीच पंडली नाही. ग्लोबल वॉर्मिंग, ढासळते पर्यावरण, वाढते प्रदूषण आणि अन्य काही कारणांमुळे ऋतुचक्रात हे बदल होत आहेत. होणारे हे बदल पाहता असे वाटते की यापुढे कदाचित दहा महिने उन्हाळा आणि दोन महिने पावसाळा असे दोनच ऋतू कदाचित असतील.


खरोखर आपण भारतीय किती सुखी आहोत नाही, आपल्याला पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अशा तीनही ऋतूंचा आनंद घेता येतोय, नव्हे आजवर आपण घेत आलो आहोत. उन्हाळ्याने तप्त झालेल्या धरित्रीसह सर्व पशू-पक्षी आणि माणसालाही पावसाचे वेध लागतात. पहिला पाऊस, मातीचा तो मन धुंद व प्रसन्न करणारा गंध, बहरलेली झाडे, सर्वत्र पसरलेली हिरवाई सारे काही आपल्याला हवेहवेसे वाटते. त्यानंतर हिवाळा येतो. पावसाळा नुकताच संपत आलेला असतो. वातावरणातील बदल आपल्याला कळत असतात. थंडीची चाहूल लागताना तयार झालेली पिके आणि त्याचा येणारा विशिष्ट गंध आता हिवाळा सुरु होणार, त्याची जाणीव करून देतो. त्यानंतर उन्हाळा येतो. मला स्वताला सगळ्यात जास्त हिवाळा, त्यानंतर पावसाळा व शेवटी उन्हाळा आवडतो.


आत्ता कुठे पावसाची चाहूल लागली आहे. एकदा का तो धबाधबा कोसळायला लागला की पावसाळी पिकनीक, ट्रेक्स आणि अन्य पावसाळी कार्यक्रमांना सुरुवात होईल. बाहेर मस्त पाऊस पडत असताना गरम गरम कांदा भजी व गवती चहाची पाती किंवा आले घालून केलेल्या वाफाळत्या चहाचे घुटके घेण्यातील मजा काही और असते. प्रेमीजनांच्या मनातही हा पाऊस रुंजी घालतो. त्यांना वेगळ्या वातावरणात घेऊन जातो. आता पुन्हा एकदा ही सर्व धमाल सुरु होईल.


चला , पाऊस आल्याचा आनंद साजरा करु या, हो पण तो साजरा करताना भान ठेवा, आपला तोल जाऊ देऊ नका, क्षणिक मजेसाठी आयुष्य पणाला लावू नका...

1 टिप्पणी: