रविवार, १२ एप्रिल, २००९

अणजूरचा श्री सिद्धिविनायक


महाराष्ट्रात ठिकठिकाणी गणपतीची देवळे अनेक असली तरी श्री सिद्धिविनायकाची अर्थात उजव्या सोंडेच्या गणपतीची स्थाने/देवळे तशी कमी आहेत. मुळात उजव्या सोंडेचा गणपती हा कडक असून, त्याची पूजा-अर्चा व सोवळे हे खूप पाळावे लागते, असे मानले जाते. त्यामुळे उजव्या सोंडेची मूर्ती खूप कमी ठिकाणी दिसून येते. सिद्धिविनायक म्हटला की सर्वांना पटकन आठवते ते मुंबईतील दादर(प्रभादेवी) येथील श्री सिद्धिविनायक मंदिर. मात्र आपल्या ठाणे जिल्ह्यात भिवंडी जवळील अणजूर या गावीही पेशवेकालीन इतिहास लाभलेला सिद्धिविनायक आहे.
आजच्या रविवारी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही डोंबिवलीतील काही मंडळी अणजूरला सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाऊन आलो. ऑर्कूटवर मी डोंबिवली नावाची एक कम्युनिटी असून आनंद पर्वते या धडपड्या तरुणाने ही कम्युनिटी सुरु केली आहे. या कम्युनिटीचे सदस्य नियिमतपणे बैठकीच्या तसेच ऑर्कूटच्या माध्यमातून संपर्कात असतात.
अणजूर (सध्या याचा उच्चार अंजूर असाही करतात) हे खूप पुरातन गाव असून ठाणे जिल्ह्यातील मुंब्र्याच्या खाडीसमोरच्या झाडीत हे गाव वसलेले आहे. या गावात नाईकांच्या पुरातन वाड्यात हा सिद्धिविनायक आहे. अणजूरच्या घराण्याचे मूळ आडनाव राणे असे होते. बिंब राजाने हा गाव इसवीसन ११६३ मध्ये अंकुशदेव राणे यांना दला. बिंब राजाच्या वंशजापैकी एक राजपूत्र व त्याच्या आईस राणे घराण्यातील एका पुरुषाने प्राणघातक संकटातून वाचवले. त्यानंतर या घराण्यास नाईक ही मानाची पदवी राजाकडून बहाल करण्यात आली. याच नाईक घराण्यात निंबाजी नाईक नावाचे पुरुष होऊन गेले. इसवीसन १५८० नंतर साष्टी प्रांतात फिरंगी येथील हिंदूंवर अत्याचार करून त्याना बाटवत होते. त्या विरोधात निंबाजींनी मोठा लढा दला. त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रल्हाद जोशी यांना मदतीसाठी पाठवले होते. पुढे निंबाजी यांच्या शामजी (पहिल्या पत्नीपासून) व गंगाजी, बुवाजी, मुरारजी, शिवजी, नारायणजी व एक कन्या (दुसऱया पत्नीपासून) या मुलांनी पोर्तुगिजांच्या विरोधात लढा दिला.
इसवीसन १७१८ मध्ये गंगाजी हे मोरगाव येथे रवाना झाले. मोरगावचा मयुरेश हे त्यांचे कुलदैवत होते. तेथून त्यांना चिंचवडला जाण्याचा आदेश मिळाला. तिथे मोरया गोसावी यांचे नातू नारायण महाराज यांनी आपला थोरला पुत्र चिंतामणी (दुसरे) यांच्याकरवी गंगाजींना अनुग्रह दिला व आपल्या पुजेतील उजव्या सोंडेच्या श्री सिद्धिविनायकाची मूर्ती आणि एक तलवार त्यांना भेट दिली. घऱी अणजूरला परतल्यानंतर इसवीसन १७१८ मध्ये आपल्या वाड्यात मूर्तीची प्रतिष्ठापना केली. हाच तो अणजूरचा श्री सिद्धिविनायक.
पुढे गंगाजी नाईक यांनी बाजीराव पेशवे व त्याचे भाऊ चिमाजी आप्पा यांची भेट घेऊन फिरंग्यानी सुरू केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. फिरंग्यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी आणि वसईचा किल्ला जिंकण्याकरता पेशव्यांनी इसवीसन १७३७ मध्ये सुरू केलेली मोहीम १२ मे १७३९ या दिवशी संपली. चिमाजी आप्पा यांच्याकडे या मोहिमेचे नेतृत्त्व होते. या मोहिमेत स्थानिकांचे संपूर्ण सहकार्य मिळाले. साष्टी प्रांत फिरंग्यांच्या तावडीतून मुक्त झाला. या कामगिरीचे बक्षीस म्हणून बाजीराव पेशवे यांनी नाईकांना अणजूर हे गाव इनाम म्हणून दिले.
या गावाच्या तीनही बाजूला पाणी असून ठाणे आणि भिवंडी येथे जाण्यासाठी रस्ता आहे. येथील नाईकांच्या वाड्यात एका खोलीत मोठ्या लाकडी मखरात पितळ्याच्या देव्हाऱयात ही सिद्धिविनायकाची प्रसन्न मूर्ती आहे. रोज सकाळ-संध्याकाळ पुजाऱयांकडून श्रींच्या मूर्तीची पूजा केली जाते. माघी चतुर्थीस येथे मोठा उत्सव असतो. दर संकष्टी व मंगळवारीही येथे दर्शनासाठी गर्दी असते. ठाणे, भिवंडी आणि कल्याण येथून काही ठरावीक अंतराने टीएमटी, केडीएमटी आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) यांची बससेवा उपलब्ध आहे. गावात सतीची समाधी, प्राचीन शंकर, हनुमान, विठोबा, राम आणि गावदेवी अशी मंदिरेही आहेत. हे देवस्थान २८४ वर्षांचे असून ज्या वास्तूत ही मूर्ती आहे तो वाडा साडेतीनशे वर्षांपूर्वीचा आहे. समस्त अणजूरकर नाईक कुटुंबियांचे हे (खासगी) देवस्थान असून श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट, अणजूर या नावाने सहाय्यक धर्मादाय आयुक्त, ठाणे विभाग यांच्याकडे त्याची नोंदणी केलेली आहे. सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत हे मंदिर दर्शनासाठी खुले असते. नाईक यांच्या घराण्यातील नववे वंशज शशिकांत नाईक हे येथे दर संकष्टीला दादरहून येतात. आम्ही गेलो
तेव्हा आम्हाला ते भेटले. आपुलकीने सर्व माहिती त्यांनी आम्हाला दिली. ज्या खोलीत सिद्धिविनायकाची मूर्ती आहे तेथे विविध वृत्तपत्रातून अणजूरच्या सिद्धिविनायकाची माहिती व लेख यांच्या झेरॉक्स कॉपीज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच येणाऱया मंडळींना अणजूरची माहिती देणारे एख पत्रकही दिले जाते.
डोंबिवली पश्चिमेला रेतीबंदर आहे. तेथून अणजूरला जाता येते. रेतीबंदरवरून प्रत्येकी पाच रुपये सीट (एकेरी प्रवासाचे तिकीट) प्रमाणे या किनाऱयावरून बोटीने दहा मिनिटात समोरच्या तिरावर (वेल्हे गाव) जाता येते. तेथून दहा ते पंधरा मिनिटे चालले की वेल्हे गावातील रिक्षातळ लागतो. तेथून रीक्षाने थेट अणजूर (अंदाजे सहा किलोमीटर)ला जाता येते. एका रिक्षातून साधाररणपणे पाच ते सहा प्रवासी घेतले जातात. या एका फेरीसाठी रिक्षावाले सुमारे नव्वद ते शंभर रुपये भाडे आकारतात. थेट जायचे नसेल तर वेल्हे गावातून रिक्षाने माणकोली फाट्यापर्यंत (सहा किंवा सात रुपये एका व्यक्तीचे) जाऊन तेथे उतरायेच आणि अणजूरला जाण्यासाठी (अंदाजे तीन किलोमीटर) दुसरी रीक्षा पकडायची. ( हे भाडेही सहा ते सात रुपये एका व्यक्तीसाठी असे असते)

२ टिप्पण्या: