शनिवार, २५ एप्रिल, २००९

दुर्गजतन आणि संवर्धन चळवळ

महाराष्ट्रातील गड आणि किल्ले आपले सांस्कृतिक वैभव असून तो इतिहासाचा मोठा ठेवा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यात विविध ठिकाणी भुईकोट, सागरी किल्ले बांधले. काही किल्ले त्यांनी जिंकून घेतले. महाराजांनी बांधलेल्या/खास बांधून घेतलेल्या किंवा कोणाकडून जिंकून घेतलेल्या या सर्व किल्ल्यांची व्यवस्था, त्यांनी उत्तम ठेवली होती. योग्य प्रकारे त्यांची निगा राखण्यात येत होती. आज काही अपवाद सोडले तर या सर्व गड व किल्ल्यांची अत्यंत दूरवस्था झालेली आहे. स्वयंसेवी आणि इतिहासाबद्दल प्रेम असणारी मंडळी आपल्या परीने त्यांची काळजी घेत आहेत. खरे तर राज्य शासनाकडून हे काम अधिक जोमाने होणे गरजेचे आहे. मात्र शासनाला भर समुद्रात तीनशे कोटी रुपये खर्च करून शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधायला पैसे आहेत परंतु त्यांचे जीवंत स्मारक असलेल्या या गड-किल्ल्यांच्या डागडुजीसाठी, त्यांच्या संवर्धनासाठी पैसे नाहीत, हे आपले दुर्दैव आहे. शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगडावर महाराज यांच्या पुतळ्यावर साधी मेघडंबरी आपण बसवू शकलेलो नाही. त्याला परवानग्या आणि अन्य सोपस्कार पार पाडण्याची आवश्यकता लागते.
मात्र असले असले तरी काही स्वयंसेवी व सामाजिक संस्था, दुर्गप्रेमी मंडळे, इतिहासाबद्दल प्रेम असणारे तरुण आपापल्यापरिने या गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करत आहेत. युग-परिवर्तक प्रतिष्ठान व रायेश्वर प्रतिष्ठान आणि पुणे जिल्ह्यातील दुर्गप्रेमी व शिवप्रेमी मंडळ ही अशीच काम करणारी मंडळे. ऑर्कूटवरील कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण या कम्युनिटीवर या संदर्भात नुकतेच वाचनात आले. योगेश फाटक यांनी याची माहिती करून दिली होती. मला हा उपक्रम खूप चांगला आणि स्तूत्य वाटला. त्यामुळे त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून आज माझ्या ब्लॉगवर मी त्याची माहिती देत आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराजाच्या हिंदवी स्वराज्यातील गडकोटांचे संवर्धन व्हावे, गड कोटांना पुन्हा एकदा जुनेएतिहासीक महत्व प्राप्त व्हावे त्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी संवर्धन व विकास आराखडा तयार करण्यात आला असुन तो महाराष्टातील सर्व किल्ल्यांसाठी राबविला जाणार आहे. सध्या या गडकोटांची अवस्था फार वाईट आहे. गडावरील काही वास्तू इंग्रजानी काळाच्या ओघात, तर काही आपल्याच बांधवानी पाडल्या आहेत. या गडकोटाचे जतन व्हावे, इतिहासाचे स्मरण व्हावे, आणि देशप्रेम जागृत व्हावे. याच उद्देशाने किल्ले संवर्धन व विकास समितीची स्थापना नुकतीच पुण्यामध्ये करण्यात आली आहे. या आराखड्यामध्ये किल्यांच्या पायथ्याशी असणारया नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. स्वयंसेवी व सामाजिक संस्था आणि राज्य शासनाच्या मदतीने हा आराखडा राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जनजागृती मोहिम, संवर्धन व विकास कामांस भोर तालुक्यातील रोहिडा उर्फ विचित्रगडापसुन सुरवात करण्यात आली. रोहिडा किल्ला हा संर्वधन व विकास कामासाठी एक प्रतिक्रूती (मौडेल) किल्ला म्हणुन निवडण्यात आला आहे.
या संर्वधन व विकास आराखड्यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. हे काम एकट्या दुकट्याचे नसुन, तसेच फक्त शासनाची जवाबदारी नसुन सर्वांचा सहभाग असणे महत्वाचे आहे. यामध्ये मुख्यत्वे गडाच्या पायथ्याशी रहाणारया लोकांचे गट करुन विविध कामे त्यांनावाटुन देणे, तसेच स्वयंसेवकांकडून त्या कामाचे अवलोकन करणे, कामाचा आढावा घेणे याचा समावेश आहे. महामार्गापासुन गडापर्यंत तसेच गडावर जाणारया मार्गामध्ये फलक लावले जाणार आहेत. गडाचा इतिहास तसेच तेथील ठळक घटना, एखाद्या गडापर्यंत जाणारया रस्त्यामध्ये सुचना फलक, अन्य माहितीचे फलक लावण्यात येणार आहेत. सध्याच्या युगात मौजमजेची व्याख्या बदलली आहे. अशा लोकांचे मत परिवर्तनकरुन गडावर दारू, सिगरेट आणि अन्य गैरप्रकार करण्यापासून परावृत्त करणे, असे प्रकार गडांवर घडू नयेत म्हणून एक स्वयंसेवक कायम गडावर ठेवणे, गडावर काय पहावे/ गडावरुन कोणत्या गोष्टी दिसतात याचेही माहितींफलक लावणे, गडाच्या पायथ्याशी राहाणारया लोकांमधुन एखादा गाईड तयार करणे, गडापर्यंत किंवा ठरावीक टप्यापर्यंत रस्ताचे काम करुन घेणे, किल्याच्या पायथ्याशी वाहन तळाची सोय उपलब्ध करुन देणे, गडावर जाण्यासाठी तसेच अवघड जागी रेलिंग उभे करणे, किल्यावर मुख्य प्रवेश द्वाराशी दरवाजा बसवणे, गडावर विज तसेच नविन प्रकारची साधने वापरुन विज निर्मिती करणे व त्याचा उपयोग गडावरील बागेसाठी मोटारने पाणी पोहचवणे, मंदिरातील दिव्यांसाठी करुन घेणे.एतिहासिक वास्तुंची दुरुस्ती करणे, स्वच्छता गृह उभारणे, गडावर वस्तुसंग्रहालय तयार करणे आदी विविध कामे केली जाणार आहेत.
आराखड्याची अंमलबजावणी व अन्य कामास सुरवात झाली असुन ह्या कामामध्ये सहभागी होण्याकरता किंवा अधिक माहितीसाठी इच्छुकांना या मंडळींशी संपर्क साधता येईल.
योगेश फाटक- ९८२३३००७२४, पंडित अर्जुनवाडकर-९८२२६७०५५८, निलेश वाळिबे-९८२२८७७७६७, मंदार केदारी-९७६४७४६४९१, राजे भोसले- ९८२३१६७०७८, सागर पालकर- ९४२२९८४३६३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा