मंगळवार, १४ एप्रिल, २००९

आगामी मराठी साहित्य संमेलन दिल्लीत

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची अध्यक्षपदाची कारकीर्द पुढच्या वर्षी संपत आहे. आगामी ८३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाले-पाटील यांच्याच अधिपत्याखाली पार पडणार असून ठाले-पाटील यांची कार्यपद्धती आणि राजकीय वजन पाहता हे संमेलन नवी दिल्लीतच होण्याची दाट शक्यता साहित्य वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१० मध्ये जानेवारी महिन्यात होईल.
महाबळेश्वर येथे ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. ८२ व्या साहित्य संमेलनासाठी रत्नागिरी, ठाणे, परभणी आदी ठिकाणांहून निमंत्रणे आली होती. मात्र ठाले-पाटील यांनी हे ८२ वे मराठी साहित्य संमेलन सॅनहोजे येथे भरविण्याचा घाट घातला होता. त्यांच्या या निर्णयावर मराठी साहित्य आणि प्रकाशन वर्तुळातून तीव्र नाराजीची प्रतिक्रिया उमटली होती. तरीही ठाले-पाटील सॅनहोजे येथे संमेलन घेण्यावर ठाम होते. हे संमेलन सॅनहोजे येथे झाले असते तर ते महामंडळाच्या घटनेच्या विरोधात ठरले असते. याच्या विरोधात कोणी न्यायालयात दाद मागितली असती तर तांत्रिक मुद्दय़ावर हे संमेलन अडचणीतही येऊ शकले असते. त्यातच रत्नागिरीकरांनी पर्यायी साहित्य संमेलन घेण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे अखेर ठाले-पाटील यांनी सॅनहोजे येथे पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन घेण्याची पळवाट काढली आणि ८२ वे साहित्य संमेलन दरवर्षीप्रमाणे राज्यात घेण्याचे ठाले-पाटील यांना जाहीर करावे लागले. मात्र या सगळ्या प्रकारात ठाले-पाटील यांचे वर्चस्व दिसून आले. महामंडळाच्या विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थेचा अपवाद वगळता अन्य घटक संस्था व संलग्न संस्थांनी ठाले-पाटील यांच्या हो ला हो म्हटले होते.
महाबळेश्वर साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी पुढील साहित्य संमेलन भरविण्यासाठी ठाणे, पुणे, परभणी आणि नवी दिल्ली येथून आमंत्रणे आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यावर दोन महिन्यांत निर्णय घेण्यात येणार आहे. ८२ वे साहित्य संमेलन भरविण्यासाठाही ठाणे, पुणे, रत्नागिरी, परभणी यांनी आमंत्रण दिले होते. त्यामुळे आगामी साहित्य संमेलन हे या पैकी एखाद्या ठिकाणी व्हावे, अशी अपेक्षा आहे.ज्या ठिकाणांहून संमेलनासाठी आमंत्रणे आली आहेत, त्या त्या ठिकाणी महामंडळाची समिती भेट देते आणि त्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येतो. मात्र ठाले-पाटील आपले राजकीय वजन आणि प्रतिष्ठा वापरून हे संमेलन दिल्लीतच घेण्याचा तसेच महामंडळ अध्यक्षपदाच्या आपल्या कारकीर्दीतील अखेरचे साहित्य संमेलन दिल्ली येथे आयोजित करून आपले वर्चस्व दाखविण्याचा ठाले-पाटील प्रयत्न करतील, अशी चर्चा मराठी साहित्य क्षेत्रात रंगली आहे.

२ टिप्पण्या: