शनिवार, ११ एप्रिल, २००९

राजकारण्यानो- जनाची नाही, मनाची तरी...

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाल्यानंतर सर्व प्रसारमाध्यमातून निवडणुकविषयक विविध बातम्या, वाद, आरोप-प्रत्यारोप व्हायला सुरुवात होते. यात एक महत्वाचा आणि नेहमी चर्चेत राहणारा विषय असतो तो निवडणुक लढवणाऱया उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेले आपल्या मालमत्तेबाबतचे प्रतिज्ञापत्र. आपण हे प्रतिज्ञापत्र शपथेवर सादर करत असल्याचे प्रत्येक उमेदवार ठासून सांगत असतो. काही अपवाद वगळता सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सादर केलेली प्रतिज्ञापत्रे पाहिली किंवा त्या संबंधीच्या बातम्या वाचल्या तर या मंडळींच्या मालमत्तेची कशी कोटीच्या कोटी उड्डाणे होत आहेत, हे पाहायला मिळते.
अर्थात या प्रतिज्ञापत्रातील सर्व काही खरे असते, यावर कोणी शेंबडे पोरही आता विश्वास ठेवणार नाही. कारण सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी जनतेची पर्यायाने मतदारांची विश्वासार्हता कधीच गमावली आहे. या मंडळींनी जाहीर केलेली एवढी कोट्यवधीची संपत्ती (प्रत्यक्षात मात्र जाहीर केल्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त असते) त्यांच्याकडे कशी आली, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात अगदी सहज येतो. जे राजकारणी पिढीजात श्रीमंत असतील, पूर्वीपासून उद्योग-व्यवसाय असेल अशांचा अपवाद सोडला तर अनेक राजकारणी, मंत्री, आमदार खासदार ते अगदी नगरसेवकापर्यंतच्या मंडळींनी ही एवढी संपत्ती कधी आणि कशी कमावली, असा प्रश्न आपल्याला पडतो. हा प्रश्न या राजकारण्यांना पडत नसेल, त्यांच्या मनात येत नसेल, असे नाही. परंतु राजकारणात टिकायचे असेल, एकामागून एक पदे मिळवून पुढे जायचे असेल तर लाज, नितिमत्ता, तत्वे हे सर्व कोळून प्यावे लागते. तसे तुमच्यात गुण असतील तरच तुम्ही यशस्वी राजकारणी होऊ शकता, हे एकदा मनाशी पक्के केले आणि गेंड्याचे कातडे पांघरले की सर्व काही जमू शकते, असे या मंडळींचे धोरण असते. नाहीतर वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे आपली नोकरी किंवा व्यवसाय करून निवृत्त झाल्यानंतरही सर्वसामान्य माणसाच्या बॅंक खात्यात इतकी रोख रक्कम, दागीने, फ्लॅट्स अशी स्थावर किंवा जंगम मालमत्ता असत नाही, मग कोणतीही नोकरी/व्यवसाय न करता या मंडळींकडे पाच वर्षांच्या कालावधीत (नगरसेवक, आमदार, खासदार अशी पदे भुषवत असताना) इतका अमाप पैसा आणि संपत्ती येते कशी, दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत भारत किंवा महाराष्ट्रातील उन्हाळा सहन होत नाही, म्हणून परदेशात थंड हवेच्या ठिकाणी सहकुटुंब जाण्यासाठी आणि एकेक महिना राहण्यासाठीचा पैसा यांच्याकडे कुठुन येतो, आलीशान मोटारी, फार्महाऊस, बंगले हे सर्व कसे येते, असे प्रश्न आपल्या मनात येतात. निव़णुकीच्या काळात सत्ताधारी, विरोधक विमाने व हेलीकॉप्टर यांचा सर्रास वापर करतात. त्याचे तासांचे भाडे काही लाख रुपयांत असते. निवडणकीच्या काळात या हवाई प्रवासावरही कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. हा पक्षाचा पैसा आहे किंवा राज्य शासनाने त्याचा खर्च केला असल्याचे उत्तर ही मंडळी देतात. परंतु राज्य शासनाचा पैसा म्हणजे येथील जनतेच्या करातून मिळालेला पैसाच असतो ना, कधीतरी या मंडळींनी आपल्या पदराला खार लावून असे दौरे केले असतील काय

मात्र वर्षानुवर्षे हे असेच चालले आहे. निवडणुका आल्या की त्याची पुन्हा उजळणी होते इतकेच. निवडणुका संपल्या की पुन्हा लोक सर्व विसरतात, हे या मंडळींना माहिती असते. अरे पण जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज आणि चाड बाळगा ना, की ती सुद्धा तुम्ही सोडली आहे. किती ओरबाडायेच आणि किती खायचे, याचा विचार राजकारणी कधी करणार आहेतl

३ टिप्पण्या:

  1. निर्लज्जम सदा सुखी असा एक वाक्प्रचार आहे. त्याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे हे नेते. या वर्षी इनकम टॅक्स डिपार्टमेंट पण ह्यांच्या संपत्तिचा रिव्ह्यु करणार असं ऐकतो. जर हे निवडून आले तर रिव्ह्यु होणार नाही , जर हारले तरच प्रॉब्लेम आहे. पंण त्यातुनही काही चिरिमिरी देउन सुटतिल हे लोकं.

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार
    आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा