शुक्रवार, १७ एप्रिल, २००९

नाठाळांचे माथी हाणू जोडा

भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी, असे संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे. त्यात थोडासा बदल करून नाठांळांचे माथी हाणू जोडा, असे म्हणण्याची नवी प्रथा आता भारतात रुढ होत आहे की काय, असे वाटावे, अशा घटना सध्या आपल्याकडे घडत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या एका पदाधिकाऱयांने गुरुवारी चप्पल फेकून मारली. त्याचा नेम थोडक्यात हुकला आणि अडवाणी बचावले. त्या अगोदर केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्यांच्यावर जोडा भिरकावला होता. तर चिदंबरम यांच्या घटनेनंतर खासदार नवीन जिंदाल यांच्यावर एका जाहीर सभेत एका गावकऱयांने चप्पल फेकली होती. इराकी पत्रकाराने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यावर काही दिवसांपूर्वी फेकलेल्या जोड्याच्या प्रकाराने आपल्या येथील मंडळींनी स्फूर्ती घेतली असावी. आपल्या येथीलही राजकाऱण्यांबाबत सर्वसामान्य माणसांच्या मनात किती असंतोष खदखदत आहे, त्याचे हे केवळ उदाहरण आहे. या घटना तशा किरकोळ असल्या आणि यापैकी काहींनी प्रसिद्धी मिळविण्यासाठी, हा प्रकार केला असला असे क्षणभर जरी गृहीत धरले तरी त्यामुळे राजकारणी मंडळींविषयची चीड, राग, मनातील खदखद प्रगट होत आहे, असे म्हणावे लागेल.
मुंबईत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेट वे ऑफ इंडिया येथे हजारो सर्वसामान्य नागरिकांनी ज्या मूकपद्धतीने राजकारण्यांविषयाची आपला रोष प्रकट केला, ती या सगळ्याची कुठेतरी सुरुवात होती, असे वाटते. बॉम्बस्फोट किंवा अशा प्रकारची एखादी घटना घडली की केवळ त्याचे राजकीय भांडवल करायचे, तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घ्यायची, मात्र मूळ प्रश्न सोडवण्यासाठी काहीही करायचे नाही, अशा प्रश्नांचा भस्मासूर निर्माण करायचा आणि नंतर तो प्रश्न आता हाताबाहेर गेला, म्हणून गळे काढायचे. केंद्रातील किंवा राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी अशा घटना घडल्यानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत राहायचे, हेच आजवर आपण पाहात आलो आहोत. कंदहार प्रकरणी तेव्हांचे केंद्रीय परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह हे दहशतवाद्यांची मुक्तता करण्यासाठी खास विमानातून घेऊन गेले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुन्हा कंदहार प्रकरण घडले तर आपण परत दहशतवाद्यांना असेच सोडायला जाऊ, असे निर्लज्ज वक्तव्य केले होते. लालकृष्ण अडवाणी यांनीही काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे जनक जीना यांच्याविषयी गौरवोद्गार काढून आपणही मागे नाही, हे दाखवून दिले होते. कॉंग्रेसवाल्यांच्या बाबतीत तर काही बोलायलाच नको. भारतातील अल्पसंख्यांकांचे विशेषत फक्त मुस्लिमांचे लांगूनचालन करणे आणि येथील बहुसंख्य हिंदूची अवहेलना करणे,यातच ती मंडळी धन्यता मानतात. शाहबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फिरवण्याची मजल दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी दाखवली होती. तर अलीकडेच मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी पकडल्यानंतर देशभरातील बॉम्बस्फोट थांबले, असे समस्त हिंदूंचा अपमान करणारे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांनी केले होते.
अरे मग गेल्या हजारो वर्षांत किंवा अगदी फाळणीच्या वेळी धर्मांध मुस्लिमांकडून भारतीयांवर जे अत्याचार झाले, अनेकांची कत्तल करण्यात आली, हजारो देवळे उध्वस्त केली गेली, तलवार व दहशतीच्या जोरावर अगणित अत्याचार केले गेले, त्याविषयी तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष तसेच कॉंग्रेसवाली मंडळी का मूग गिळून गप्प बसतात. उपदेशाचे डोस फक्त हिंदूनाच पाजायचे का,
त्यामुळे सभोवताली हे जे काही घडत चालले आहे, सर्वपक्षीय राजकारणी (मग कोणीही त्यास अपवाद नाही) केवळ सत्ता, स्वार्थ यातच गुरफटल्यामुळे देव, देश आणि धर्माबद्दल ते किती निर्ढावलेले आहेत, ते आता दिसू लागले आहे. केवळ पोपटपंची करून, भूलथापा देऊन आणि पक्षीय आरोप-प्रत्यारोप करून देशासमोरचे प्रश्न सुटणार नाहीत, हे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनाही चांगले माहिती आहे. मात्र मतदार व जनता मूर्ख आहे, आपण काहीही केले तरी थोड्या दिवसांनी लोक विसरून जातात, या भ्रमात आता राजकारण्यांनी राहून नये. सध्या फक्त जोडे खाण्याचीच वेळ येत आहे, मात्र येत्या काही वर्षांत एक दिवस असा येईल की, संतापलेले लोक, या राजकारण्यांना भर चौकात फटकावून, जोडे मारून आणि तोंडाला काळे फासून आपल्या मनातील असंतोष व्यक्त केल्याशिवाय राहणार नाहीत. सध्याचे एकूण वातावरण पाहता तो दिवस दूर नाही...

1 टिप्पणी: