गुरुवार, २३ एप्रिल, २००९

धारावी

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी, अशी बिरुदावली मिरवणाऱया धारावीत बुधवारी काही तास दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सुरेश गंभीर यांच्या प्रचारफेरीचे वृत्तांकन करण्यासाठी फिरलो. बातमीच्या तसेच अन्य काही कामाच्या निमित्ताने यापूर्वीही धारावीत जाण्याचा प्रसंग आला होता. आजवर केवळ पुस्तकातून किंवा चित्रपटातून धारावीबद्दल वाचले/पाहिले होते होते. मात्र त्यामुळे वास्तव कळून येत नाही. ते प्रत्यक्ष फिरल्यानेच कळू शकते. आपल्या मध्यमवर्गीय आणि सुखवस्तू मानसिकेतून बाहेर पडून धारावीचे हे वास्तव जीवन, तेथील लोकांचे राहणीमान पाहिले तरी अंगावर काटा येतो. केवळ काही तास तेथे फिरल्याने आपली जर ही अवस्था होत असेल तर तेथे राहणाऱया लोकांचे काय, त्यांना आता तशाच राहणीमानाची व जीवनाची सवय झाली असेल, असे म्हणून या वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
मी बुधवारी धारावीचा खांबदेवनगर, नव्वद फूट रस्ता, मदिना वसाहत,ढोरवाडा, गांधी मैदान आणि अन्य परिसर फिरलो. हा परिसर म्हणजे संपूर्ण धारावी नाही. तरीही केवळ या भागात फिरल्यानंतर संपूर्ण धारावी आणि तेथील जीवनाचे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. माझे लहानपण टिपीकल मध्यमवर्गीय, ब्राह्मणी कुटुंबात आणि टु रुम किचनच्या फ्लॅट संस्कृतीमधील. मध्यमवर्गीय व ब्राह्मणी संस्कारात वाढलेलो, मोठा झालेला. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणही चांगल्या शाळा-महाविद्यालयात झालेले. आजूबाजूचा परिसर, शेजारही सुशिक्षित व मध्यमवर्गीय संस्कृतीचा. त्यामुळे असेल परंतु, अशी वस्ती, वसाहत किंवा झोपडपट्टीतील जीवन पाहिले की मनात येते की आपण कितीतरी पटीने सुखी आणि सुदैवी म्हणायला पाहिजे.
धारावीत फिरणे म्हणजे चक्रव्युहात शिरण्यासाऱखे आहे. आपल्याला या चक्रव्युहात जाता येते मात्र त्यातून बाहेर पडणे कठीण असते. तेथील माहितगार बरोबर असल्याशिवाय नेमके बाहेर कुठून व कसे बाहेर पडायचे ते कळत नाही. जेमतेम एक माणूस जाऊ शकेल अशी चिंचोळी गल्ली, एकमेकांना खेटून असलेली घरे (खरे तर त्यांना घर का म्हणायचे), घरासमोरच वाहणारी उघडी गटारे, सार्वजनिक स्वच्छतागृहे, घरापाशी किंवा स्वच्छतागृहाजल असलेला पिण्याच्या पाण्याचा नळ, अंधारी जागा, घरावर पत्रे किंवा काही ठिकाणी प्लास्टीकचे आच्छादन, वाटेल तिथून आणि वाटेल तशा गेलेल्या विजेच्या वायरी, हवा किंवा सूर्याचा प्रकाश यांना जणू काही कायमची प्रवेशबंदी, असे धारावीचे सर्वसाधारण दृश्य.
धारावीत अनेक ठिकाणी विविध लहानमोठे उद्योग व्यवसायही चालतात. तेथे एका छोट्याश्या खोलीमध्ये किमान दहा जणांपासून ते कमाल वीस-पंचवीस जणांपर्यंत कामगार राहात असतात. हे प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार येथून आलेले. अशीच परिस्थिती घरांमधील. म्हातारे आई-वडिल, त्यांची लग्न झालेली मुले, नातवंडे लहान घरांमधून राहातात. बहुतांश वस्ती ही आर्थिकदृष्ट्या हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील. अर्थात याला काही अपवादही आहेत. शिकलेली, चांगल्या ठिकाणी नोकरी करणारी मात्र मुंबईत जागा घेणे परवडत नाही म्हणून किंवा पिढ्यानपिढ्या धारावीत राहतात आणि आता पुनर्विकासात नवीन घर मिळेल, या आशेवर जगणारी अनेक कुटुंबेही येथे राहातात.
घऱात दोन दिवस पिण्याचे पाणी आले नाही, लोडशेडींगमुळे लाईट गेले म्हणून, उन्हाळ्यात किती उकडताय म्हणून वैतागणारी आपण मंडळी. धारावी किंवा तत्सम झोपडपट्टीतील लोक कशी राहातात, याचा कधी विचारच करत नाही. आपल्याला काय त्याचे, असे म्हणतो आणि सोडून देतो. अशा ठिकाणी राहणाऱया लहान मुलांवर काय संस्कार होणार, लहान वयातच जे कळायला नको, ते कानावर पडल्यामुळे किंवा पाहायल्यामुळे त्यांचे बालपण हे बालपण राहात असेल का. तरुण मुलींचे तारुण्य येथे कसे फुलत असेल, येथे वाढणारी भावी पिढी कोणते संस्कार आणि विचार घेऊन मोठी होत असेल, असे अनेक विचार मनात येतात. अर्थात चांगल्या किंवा सुशिक्षित घरातील मुले किंवा माणसेही अनेकदा संस्कारहीन होतात, सख्खा भाऊ आपल्या मोठ्या भावाची हत्या करतो, मुलगा आई-वडिलांना किंवा नवरा-बायकोला मारहाण करतो, शिव्या घालतो, वाईट संगतीला लागतो आणि झोपडपट्टीत किंवा अशा तथाकथीत संस्कारहीन वातावरणात लहानाचा मोठा झालेला व राहणारारी एखादी व्यक्तीही सुसंस्कारीत व खऱया अर्थाने सुशिक्षित होऊ शकते, हा भाग वेगळा.
धारावी किंवा अशा झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱया लोकांचे जीवनमान कधी तरी बदलेल का, त्यांच्या आयुष्यात कधी आनंदाचे क्षण येतील काय, स्वच्छ व मोकळी हवा त्यांना कधी मिळेल का,
महापालिका, विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुका आल्या की सर्वपक्षीय राजकीय नेते, निवडणुकीला उभे असलेले उमेदवार अशा वस्तांमध्ये प्रचार करताना भरघोस आश्वासने देतात. आम्हाला मत द्या म्हणजे आम्ही तुमच्या जीवनात बदल घडवून आणू म्हणून स्वप्न विकतात. तसे झाले असते तर आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे निवडणुका झाल्या. त्यामुळे हे चित्र खरेतर कधीच बदलायला हवे होते. मात्र प्रत्यक्षात असे दिसते की धारावी किंवा अशा झोपडपट्ट्यांमधील लोकांचे आयुष्य व राहणीमान सुधारणे तर सोडाच परंतु या झोपडपट्ट्या कमी न होता वाढतच चालल्या आहेत. या ठिकाणी राहणाऱया लोकांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. ते आहेत तिथेच असून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचे आयुष्य मात्र कमालीचे बदलून गेलेले पाहायला मिळते.
झोपडपट्टी किंवा अशा वसाहतींमध्ये कोणी खुषीने आणि आनंदात राहात नाही. केवळ नाईलाज म्हणून अनेकांना येथे राहावे लागते. झोपडपट्टी म्हटली की आपण सुशिक्षित मंडळी नाके मुरडतो. या झोपडपट्ट्या निर्माण व्हायला राजकीय पक्ष आणि त्यांची नेते मंडळीच कारणीभूत आहेत. एकगठ्ठा राजकीय मतांसाठी याच मंडळींनी हा भस्मासुर निर्माण केला.येथील लोकांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी नेहमीच वापर करून घेतला. मुळात एखाद्या भागात, परिसरात अनधिकृतपणे असे एखादे झोपडे बांधले गेले तेव्हाच ते हटवले असते, तर आज अनधिकृत झोपडपट्ट्यांचा हा राक्षस निर्माणच झाला नसता. राजकीय सोयीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पोलीस, महापालिका, अन्य शासकीय विभाग हे एकमेकांच्या हातात हात घालून, अनेकांचचे हात ओले करून आपल्याला जसे हवे तसे करून घेत असतात. एका झोपड्यानंतर हळूहळू अनेक झोपड्या तयार होतात. त्यांना वीज, पाणी मिळते. काही दिवसांनी शिधावाटपपत्रिका मिळून ते अधिकृत नागरिकही होतात. मात्र या सगळ्यात त्यांची दुरावस्था किंवा दैन्यावस्था काही दूर होत नाही. राजकीय संरक्षणामुळेच आज मुंबईत पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिन्यांनाही हजारो बेकायदा झोपडपट्ट्यांचा विळखा पडलेला आहे. याच झोपडपट्ट्यांमधून बांगलादेशी नागरिक बेकायदा राहात असून अनेक अनैतिक व्यवसाय येथे सुरू आहेत.
राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींनी निर्माण केलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये आज लाखो नागरिक नरकासारखे जीवन जगत आहेत. माणसांसाठी आवश्यक असलेल्या अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजाही आपण स्वातंत्र्यानंरच्या इतक्या वर्षांत पूर्ण करू शकललो नाही. झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली या लोकांना मोठी स्वप्न दाखवली जातात आणि पुन्हा याच लोकांच्या मतांवर राजकारणी मंडळी निवडून येतात. मात्र इथे राहणाऱया लोकांच्या आयुष्यात व राहणीमानात काहीही फरक पडत नाही, हे असे किती दिवस आणि कुठवर चालणार.
असे असले तरी अशा ठिकाणी राहून चांगले शिक्षण घेणाऱया, आपल्या वागण्यात नैतिकता आणि संस्कार असणाऱया, आहे त्या परिस्थितीतही आनंदाने जगणाऱया या सर्व मंडळींना खरोखरच मनापासून सलाम...

३ टिप्पण्या: