सोमवार, ११ मे, २००९

शतकातील सर्वात मोठे खग्रास सूर्यग्रहण

सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाबद्दल सध्याच्या काळात समाजात बऱयापैकी जागरुकता निर्माण झाली आहे. विविध वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या आदी प्रसारमाध्यमातून त्याविषयी वेळोवेळी माहिती मिळत असल्याने आबालवृद्धांच्या मनात आता ग्रहण तसेच अन्य खगोलशास्त्रीय घटनांबद्दल उत्सुकता निर्माण झालेली असते. मराठी विज्ञान परिषद आणि अन्य संस्था, संघटना ग्रहण किंवा अशा विशेष खगोलशास्त्रीय घटनांसाठी सहली काढणे, काही मंडळींना एकत्र आणून त्याची शास्त्रीय माहिती देणे अशी कामे करत आहेत. त्यामुळे आता ग्रहण म्हणजे आपत्ती न मानता एक पर्वणी मानण्यात येते. खगोलअभ्यासक, खगोलशास्त्रज्ञ आणि हौशी मंडळी या निमित्ताने ग्रहणाचा आनंद घेत असतात. अर्थात असे असले तरी ज्योतिष्यांच्या मते होणारी ही ग्रहणे किंवा खगोलशास्त्रीय घटना या मानवी जीवन व विविध राशींवर परिणाम करणाऱया असतात. त्याचे बरे-वाईट परिणाम माणसांच्या आयुष्यावर होत असतात. अर्थात यावर कोणी व किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असो.
आज हे सांगायचे कारण म्हणजे सकाळ-मुंबईच्या टुडे पुरवणीत वाचनात आलेली बातमी. सकाळच्या टुडे पुरवणीत (११ मे २००९) शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण येत्या २२ जुलैला अशी एक बातमी आली आहे. खगोलशास्त्राचे अभ्यासक मोहन आपटे यांचा हवाला देऊन ही बातमी देण्यात आली आहे. या बातमीनुसार २१ व्या शतकातील सर्वात मोठ्या कालावधीचे आणि या वर्षातील जगातील दुसरे सूर्यग्रहण येत्या २२ जुलै २००९ रोजी आहे. हे खग्रास सूर्यग्रहण असून ते केवळ पॅसिफिक महासागक, चीन व भारतातून पाहता येणार आहे. पॅसिफिक महासागरातील बेटांवर तेथील स्थानिक वेळेनुसार हे खग्रास ग्रहण दुपारी बारा वाजता तर भारतात सकाळी सहा वाजून २२ मिनिटांनी दिसणार आहे. भारतात हे ग्रहण साडेतीन ते चार मिनिटांचे असेल. भारतातील सुरत, इंदूर, वारणसी, पाटणा, सीलीगुडी येथून हे पाहता येणार आहे. उर्वरित विरळ सावलीच्या पट्ट्यात न्हणजे दिल्ली, बंगलोर, उत्तर व दक्षिण भारतातील शहरातून ते खंडग्रास दिसणार आहे.अर्थात हा काळ आपल्याकडे पावसाळ्याचा असल्याने हे ग्रहण आपल्याला पाहता ेईल की नाही, त्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
याच बातमीत कंकणाकृती सूर्यग्रहणाबद्दलची माहिती देण्यात आली आहे. १५ जानेवारी २०१० रोजी हे ग्रहण होणार असून दुपारी १ वाजून १८ मिनिटांनी कंकणाकृती सूर्यग्रहणाचा पट्टा हिंदी महासागरातून जाणार आहे. त्यामुळे भारतातून कन्याकुमारी येथे हे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहता येणार आहे. सकाळ-मुंबईच्या टुडे मधील सूर्यग्रहणाची ही बातमी सचिन उन्हाळेकर यांनी दिलेली आहे.
ही बातमी वाचल्यानंतर माझ्या मनात १९८२ मध्ये भारतात झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी आजच्या सारखे दूरचित्रवाहिन्यांचे पेव फुटलेले नव्हते. दूरदर्शन हेच एकमात्र चॅनेल होते. बाकी वृत्तपत्रे व साप्ताहिकातून याची भरपूर प्रसिद्धी झालेली होती. त्यामुळे या दिवशी काय होईल, नेमके हे ग्रहण कसे असेल, त्यामुळे काय होणार,त्याची उत्सुकता सर्वानाच होती. दूरदर्शनवरून हे ग्रहण दाखविण्यात येणार होते. या ग्रहणाच्या निमित्ताने दूरदर्शनवरून त्यावेळी चित्रपटाचे प्रसारण करण्यात आले होते्. हे खग्रास ग्रहण नुसत्या उघड्या डोळ्यांनी पाहू नका, असे आवाहन वारंवार केले जात होते. ग्रहण पाहण्यासाठी खास गॉगल तयार करण्यात आले होते. आणि अखेर तो दिवस उजाडला. सकाळपासूनच सर्वत्र उत्सुकता, काही प्रमाणात भिती होती. अनेक जणांनी ऑफीसलाही दांडी मारून घरी बसणेच पसंत केले होते.
मी त्यावेळी दहावीला होतो. आमच्या सोसायटीत राहणाऱया माचवे यांच्याकडेच टीव्ही होता. आमच्या बिल्डींगमधील आम्ही सर्वजण त्यांच्या घरी सिनेमा व ग्रहण पाहण्यासाठी जमलो होतो. मला आठवताय दुपारी साडेतीन की चारच्या सुमारास सूर्य संपूर्ण खग्रास अवस्थेत जाणार होता. टीव्हीवर एकीकडे सिनेमा सुरू होता व एका कोपऱयात सूर्यग्रहणाची दर मिनिटाला बदलणारी स्थिती दाखविण्यात येत होती. आणि तो क्षण आला टीव्हीवर संपूर्ण सूर्य झाकला गेल्याचे दिसले. मी आणि अन्य काही जण लगेच पटांगणात जमलो. भर दुपारी चारच्या सुमारास अंधारून आले होते. सूर्यास्त झाल्यानंतर जसे वातावरण असते, तसे बाहेर दिसत होते. थोडा वारा सुटलेला होता. पक्षी संध्याकाळ झाली असे समजून घरट्यांकडे परतत होते. तर कावळे, चिमण्या, साळुंक्या आदी पक्षी ओरडत होते. एक वेगळेच वातावरण पाहायला मिळाले. काही मिनिटे ही खग्रास अवस्था होती. त्यानंतर ग्रहण सुटायला लागले. दे दान सुटे गिऱहाण म्हणत बायका सगळीकडे फिरायला लागल्या.
त्यानंतर आपापसात तू ग्रहण पाहिले का, मी पाहिले, काय मस्त अनुभव होता ना, संध्याकाळ झाल्यासाऱखा काळोख कसा पडला अशी चर्चा सुरू झाली. दुसऱया दिवशी शाळेतही याच विषयावर गप्पा झाल्या.
खरेच एक वेगळाच आणि अविस्मरणीय असा तो अनुभव होता. त्या अनुभवाचे साक्षीदार होण्याची संधी त्यावेळी मिळाली व ती घेतली हे खरेच भाग्य...

३ टिप्पण्या:

  1. बातमीनुसार २१ व्या शतकातील सर्वात मोठ्या कालावधीचे आणि या वर्षातील जगातील दुसरे सूर्यग्रहण येत्या २२ जुलै २००९ रोजी आहे.
    .
    thanks.. for info...

    उत्तर द्याहटवा
  2. मला माहीत नव्हते, माहीतीबद्दल धन्यवाद. आपल्या महाराष्ट्रात दिसणार काय?

    उत्तर द्याहटवा