रविवार, ३१ मे, २००९

गणितासाठीचा डोंबिवली पॅटर्न

आनंदकुमार बाळकृष्ण गोरे यांच्या संकल्पना आणि लेखनातून साकार झालेल्या गणित या विषयावरील डोंबिवली पॅटर्न या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांना गणित हा विषय खूप अवघड जातो. हा विषय सोपा वाटावा आणि मुलांना या विषयात गोडी निर्माण व्हावी, असे लेखकाला अनेक वर्षांपासून वाटत होते. त्यांची ही धडपड त्यांच्या या पुस्तकातून साकार झाली आहे. पुस्तकाची पहिली आवृत्ती २९ जुलै २००७ मध्ये आणि आता दुसरी आवृ्त्ती ४ जानेवारी २००८ मध्ये प्रकाशित झाली आहे. डोंबिवलीच्याच अंजली प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पालक आणि मोठ्या माणसांसाठीही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त व संग्राह्य आहे. पुस्तकाचे मूल्यही अवघे शंभर रुपये इतके आहे.


पुस्तकाची पहिली आवृत्ती चार महिन्यात डोंबिवलीतच संपली. या पुस्तकाची लवकरच इंग्रजी आवृत्तीही प्रकाशित करण्यात येणार आहे. मुलांसाठी लिहिणे हे मुळातच आव्हानात्मक काम असून त्यातून गणितासारखा न आवडणारा विषय सोपा करून मुलांना गोडी लावायची हे कठीणच, असे लेखकांने दुसऱया आवृत्तीच्या आपल्या मनोगतात म्हटले आहे. हे पुस्तक लिहिताना लहानपणचे दिवस आठवतात. माझे वडील १ ली ते ४ थी पर्यंत रोज सकाळी पाढे, पावकी, निमकी, पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी आणि औटकी लिहून घेत असत. व संध्याकाळी परवचा म्हणण्यापूर्वी म्हणायला लावत असत. त्यानंतर दहा मिनिटे अधले मधले पाढे ते औटकी यातील काहीही विचारत असत. अगदी रोज. त्यानंतर तोंडी गणित विचारत अशत. व त्याची उत्तरेही झटपट दिलीच पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असे. पुढे शाळेतील माझे शिक्षक प्रभाकर गद्रे यांनी माझ्याकडून तयारी करून घेतली. हे पुस्तक लिहिताना त्यांच्याशीही चर्चा झाल्याचे गोरे यांनी आपल्या ऋणनिर्देशात म्हटले आहे.


पुस्तकाची प्रस्तावना र. म. भागवत यांची आहे. आपल्या प्रस्तावनेत भागवत यांनी म्हटले आहे की, गणिताच्या अभ्यासाचे अंकगणित, बीजगणित आणि भूमिती असे तीन विभाग आहेत. अंकगणित आणि बीजगणित यासाठी आकडेमोड करण्याचे कौशल्य आवश्यक असते. भूमितीमध्येही ते आवश्यक आहे्. म्हणूनच आकडेमोडीचे कौशल्य अवगत केले की गणिताच्या सर्व विभागांचा अभ्यास सुधारतो. एकदा हे कौशल्य प्राप्त केले की ते कायमचे टिकते आणि पुढील आयुष्यातही ते उपयोगी पडते. भारतामध्ये तोंडी गणिताची परंपरा खूप पूर्वीपासून चालत आली आहे. मध्यंतरी आधुनिक शिक्षण पद्धतीच्या नावाखाली पाठांतराची पद्धत नाहीशी झाली किंबहुना ती केली गेली. त्याचे दुष्पपरिणाम आजचे विद्यार्थी भोगत आहेत. गोरे यांनी गणिताच्या अभ्यासातील ही त्रुटी ओळखली आहे. म्हणून त्यांनी पाढे, सूत्रे आणि प्रमेयाची विधाने तोंडपाठ करण्यावर या पुस्तकात भर दिला आहे्. तसेच तोंडी बेरीज व वजाबाकी कशी करायची याचेही मार्गदर्शन केले आहे. त्यांनी ठरवलेल्या रीतीने या पुस्तकाचा उपयोग केला तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना गणितामध्ये चांगले गुण मिळतील व त्यांची गणिताबद्दलची भीती कायमची नाहीशी होईल, यात शंका नाही.


या पुस्तकात वर्ग व घन चालीत कसे म्हणायचे, तिरका/तिरकस गुणाकार म्हणजे काय, त्रैराशिक व त्याचा उपयोग, वर्ग त्रिपदीचे अवयव कसे पाडायचे, वर्ग पाठ असण्याचे फायदे, अवयव पाडण्याचे नाविन्यपूर्ण सूत्र, भूमितीची गणिते सोडवताना कोणते त्रिकोण समरुप दाखवायचे याचे स्पष्टीकरण/पद्धत आदी वेगळी माहिती या पुस्तकात आहेच. त्याचबरोबर पाठांतराचे फायदे, २ ते ३० पाढे, पावकी, निमकी, वर्ग व त्याचे उच्चार, घन, विभाज्यतेच्या कसोट्या,अपूर्णांक, दशांश अपूर्णांकाच्या क्रिया, घातांकाचे नियम, करणी, गुणोत्तर प्रमाण, वर्गसमीकरणे, त्रिकोणमिती, अपूर्णांक बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काही महत्वाच्या व्याख्या व माहिती, व्याख्या, गुणधर्म, व प्रकार, चौकोनांचे प्रकार, भूमिती-काही गृहीतके, व्याख्या, एकरुपता, प्रमेय यांचीही माहिती आहे. विद्यार्थ्यांना सरावासाठी १६ सराव संग्रह दिले आहेत.



अधिक माहिती व पुस्तकासाठी संपर्क

आनंदकुमार गोरे, ए-१, देवांग सागर, प्रांजली बंगल्यामागे, नांदिवली पथ, डोंबिवली-पूर्व

दूरध्वनी-०२५१-२८८३५८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा