मुंबई सकाळमध्ये नोकरी करत असताना तेव्हाचे मुंबई सकाळचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांच्या परवानगीमुळे मला आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागात कॅज्युअल न्यूजरिडर म्हणून सुमारे दीड ते दोन वर्षे काम करता आले. प्रादेशिक वृत्तविभागात दुपारी १ ते ७ अशी ड्युटी असायची. दोन/तीन महिन्यातून एकदा हे कॉन्ट्रक्ट मिळायचे. मग त्यावेळी मुंबईसकाळ मध्ये मी रात्री ८ ते १२ अशी ड्युटी करायचो. मी मुंबई सकाळमध्ये रिपोर्टिंगला होतो. प्रत्येक रिपोर्टर्सला दोन/तीन महिन्यातून एकदा नाईट ड्युटी यायची. ही ड्युटी संध्याकाळी ६ ते १२ अशी असायची. शक्यतो मी माझ्या याच ड्युटीच्या काळात आकाशवाणीवर माझे कॉन्ट्रक्ट घेत असे. नार्वेकर साहेब यांच्यामुळे मला दोन तासांची सवलत मिळत असे. संध्याकाळी सातच्या प्रादेशिक बातम्या झाल्या की मी चर्चगेटहून प्रभादेवीला आमच्या मुंबई सकाळच्या ऑफिसमध्ये येत असे. साधारण १९९१-९२ व ९३ असा सुमारे दीड-दोन वर्षे मी आकाशवाणीवर होतो. अर्थात हे सर्व नार्वेकर यांनी दिलेल्या परवानगीमुळेच मला करता आले हे विसरून चालणार नाही.
आकाशवाणीचे ते दिवस खूप मस्त होते. वृत्तपत्रात/ आकाशवाणीवरुनच आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागात कॅज्युअल न्यूजरिडर हवे असल्याची जाहिरात आली होती. मी अर्ज केला. लेखी व आवाजाची परीक्षा आणि इंटरव्हयू यातून पार झालो व माझी कॅज्युअल न्यूजरिडरच्या पॅनेलवर निवड झाली. आता नेमक्या पहिल्या बातम्या मी कधी वाचल्या ते आठवत नाही. आकाशवाणीवर जे काही दी़ड-दोन वर्षे काम केले त्यात खूप मजा आली. लहानपणी मी ज्यांचे आवाज केवळ ऐकले होते त्या मंडळींबरोबर मला प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. यात ज्येष्ठ वृत्तनिवेदक कुसुम रानडे, शरद चव्हाण आणि ललिता नेने यांचा समावेश होता. शरद चव्हाण आणि नेने व रानडे बाई यांचा आवाज अगदी थेट परिचयाचा होता. जसा पुणे आकाशवाणीच्या सुधा नरवणे यांचा आवाज. सकाळी ७-०५ च्या बातम्या वाचायला बहुतेक त्या असायच्या.
तसेच या तीघांचे आवाज कानात बसलेले होते. मला आठवताय पहिल्या दिवशी मला दुपारी पावणेतीनचे बातमीपत्र वाचायला मिळाले होते. (आता ते दुपारी १-४५ ला असते) माझा पहिलाच दिवस होता. त्यावेळी दोन ज्येष्ठ वृत्तनिवेदक व एक कॅज्युअल असे लोक ड्युटीला असायचे. शरद चव्हाण, कुसुम रानडे, ललिता नेने हे तीघेही आकाशवाणीचे स्टाफ वृत्तनिवेदक होते. वसंत ऊर्फ दादा देशपांडे हे आकाशवाणीचे स्टाफ रिपोर्टर होते. ते मंत्रालय, विधानमंडळ, राजकीय आणि अन्य महत्वाच्या बातम्यांचे वृत्तांकन करायचे. असो. तर मी सांगत होतो, माझ्या आकाशवाणीवरील पहिल्या दिवसाबद्दल.
तर सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या. वृत्तसंपादक म्हणून हरिश कांबळे त्यावेळी काम पाहात होते. माझा पहिलाच दिवस. त्यामुळे मला दुपारी दीडच्या बातम्या वाचायला दिल्या होत्या. या बातम्या पाच मिनिटांच्या असतात. मी स्टुडिओत गेलो. स्टुडिओत जाण्यापूर्वी मला सगळ्या सूचना देऊन ठेवलेल्या होत्या. स्टुडिओत लाल दिवा लागला की वाचायला सुरुवात करायची.वगैरे, वगैरे. लाल दिवा लागला, आणि मी वाचायला सुरुवात केली, आकाशवाणी मुंबई, शेखर जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे...
काही क्षण थोडेसे दडपण माझ्यावर होते. पण नंतर ते संपले. बातम्या वाचून मी वर आलो. हरीश कांबळे आणि अन्य सर्वानी बातम्या चांगल्या झाल्या असल्याचे सागून मला प्रोत्साहित केले. त्यानंतर अगोदर म्हटल्याप्रमाणे दोनत-ीन महिन्यातून एकदा मला कॉन्ट्रक्ट मिळत जाचये. अशाच एका कॉन्ट्रक्टमध्ये मला एकदा संध्याकाळच्या सातच्या प्रादेशिक बातम्या वाचण्याची संधी मिळाली. त्या बातम्या दहा मिनिटांच्या असतात व त्या राज्यातील सर्व केंद्रे सहक्षेपित करतात. त्याला श्रोतेही दुपारच्या तुलनेत जास्त असतात. या बातम्यांच्या वेळी पाच मिनिटांनतर या बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देण्यात येत आहेत, असे वाक्य म्हणायचे असते. माझी पहिलीच वेळ असल्याने गडबडीत ते लक्षात राहील की नाही, म्हणून माझ्याबरोबर नेने बाई स्टुडिओत आल्या होत्या. माझ्या समोर त्या उभ्या राहिल्या. पाच मिनिटे झाल्यावर त्यांनी एक कागद हळूच माझ्यासमोर धरला. त्यावर ते वाक्य लिहिलेले होते. बातम्या संपायला काही सेकंद बाकी असताना, नेनेबाईंनी ठळक बातम्या, असा कागद मला दाखवला. कारण बातम्या संपताना दहा-पंधरा सेकंद बाकी असताना शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या, असे वाचायचे असते. माझा पहिलाच दिवस असल्याने गडबडीत लक्षात राहिले नाही तर पंचाईत नको, म्हणून नेनेबाई स्वत स्टुडिओत आल्या होत्या. माझा हा पहिला दिवसही उत्तमप्रकारे पार पडला. त्यानंतर शरद चव्हाण आणि ललिता नेने जर ड्युडीला असतील तर त्या दोघांपैकी एक जण दुपारच्या आणि मी नेहमी संध्याकाळच्या बातम्या वाचायचो. रानडे बाई असल्या की मात्र एकेक दिवस आलटून-पालटून आम्ही दुपारच्या व संध्याकाळच्या बातम्या वाचायचो.
स्टुडिओतील मईक खूप शक्तीशाली असतो. त्यामुळे माईकपासून नेकमे किती अतंकावर बसायचे, बातम्यांचे जे कागद असतात, त्यांना टाचणी लावायची नाही, एका कागदावर एकच बातमी लिहायची, बातमी वाचून झाली की हळूच कागद बाजूला सरकावायचा, बातम्यांचे वाचन सुरू असताना समोरच्या घड्याळाकडे लक्ष कसे ठेवायचे, दहा मिनिटांच्या बातम्या संपवताना दहा-पंधरा सेकंद बाकी असताना पुन्हा ठळक बातम्या वाचायच्या, एखादी महत्वाची बातमी ऐनवेळी स्टुडिओत आणून दिली तर तिला कसे स्थान द्यायचे, मग इतर बातम्या कशा पुढे-मागे करायच्या, सगळ्यात महत्वाचे म्हणजे आकाशवाणीच्या माध्यमात केवळ तुमच्या आवाजाने तुम्ही श्रोत्यांपर्यंत पोहोचत असता. त्यामुळे शब्दोच्चार शुद्ध, स्पष्ट व स्वच्छ असणे अत्यंत गरजेजे असते. माझ्या बाबतीत तो प्रश्न नव्हताच. पण बातमी वाचताना नेमक्या कोणत्या शब्दांवर/ वाक्यावर जोर द्यायचा, कुठे पॉज घ्यायचा, शब्दोच्चार कसे करायचे आणि केवळ आपल्या आवाजाद्वारे समोरच्या सर्व वयोगटातील श्रोत्यांपर्यंत बातमी कशी पोहोचवायची, हे सर्व मला माझ्या या आकाशवाणीच्या दिवसात हळूहळू शिकायला मिळाले. तीनही ज्येष्ठ वृत्तनिवेदकांचे व वृत्तसंपादक हरीश कांबळे, दादा देशपांडे, सहकारी वृत्तनिवेदक या सर्वांचे उत्तम सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.
आकाशवाणीवरील दिवसांच्या इतरही अनेक आठवणी आहेत. त्याविषयी उद्या दुसऱया भागात...
गुरुवार, २१ मे, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
सुधा नरवणेंचा आवाज आजही मला आठवतो. आकाशवाणीवरील असे अनेक आवाज मनात घर करून राहिले आहेत. तुमच्या ह्या पोस्ट्मुळे त्यांना उजाळा मिळाला. धन्यवाद.
उत्तर द्याहटवानमस्कार,
उत्तर द्याहटवाआपली प्रतिक्रिया मिळाली, खूप छान वाटले. धन्यवाद.
शेखर जोशी
Majha ek mitra hota sorry ahe nitin kelkar mhanun to pan akashavani nagapur la batamya vachayaca. baryach gamati sanagayacha .nanatar sapat maha characha madhe pan kahi varsh conduct karayacha TV var. tumacyaa posT mule tyachi athvan jhali. bhetale pahije ekada.. :)
उत्तर द्याहटवाGood post.
नमस्कार,
उत्तर द्याहटवाआपली प्रतिक्रिया मिळाली. खूप छान वाटले. नितीन केळकर यांना मी ओळखतो. ते आता परत सह्याद्रीवर वृत्तसंपादक म्हणून आले आहेत.
शेखर जोशी
kityek lok aavajane olakhiche hotaat he agadi khar ahe.
उत्तर द्याहटवाdurdaivane amacha radio bighadala an amhi ya anadala mukalo... pan ajunahi akashvaniche karyakram ani vruttanivedak athavataat.
विजय देशमुख
उत्तर द्याहटवानमस्कार
प्रतिक्रियेबद्दल आभार.
शेखर