मंगळवार, १२ मे, २००९

प्रवासातील औषधे

शाळा-महाविद्यालयांच्या उन्हाळी सुट्ट्या संपायला अद्याप एक महिना बाकी आहे. या सुट्ट्यांमुळे अनेक मंडळी बाहेरगावी फिरायला किंवा काही जण आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. सध्या उन्हाळाही खूप कडक असून प्रवासात प्रत्येकालाच आपल्या प्रकृतीबाबतच्या तक्रारी उद्भवू शकतात. अशा काही किरकोळ तक्रारींमुळे आपल्या प्रवासाच्या आनंदावर विरजण पडू शकते. मात्र थोडीशी काळजी घेतली आणि काही उपयुक्त औषधे जवळ बाळगली तर हा त्रास लवकर आटोक्यात येऊ शकतो.
प्रवासात असताना बदललेली हवा, पाणी, अन्न यामुळे होणाऱया त्रासावर ही औषधे उपयुक्त आहेत. या संदर्भात माझ्या वाचनात आलेल्या एका पुस्तकातील ही माहिती आज आपल्याला देत आहे. भा. का. गर्दे यांनी संकलित केलेल्या धन्वंतरी तुमच्या घरी या पुस्तकातील ही माहिती सर्वानाच उपयुक्त आहे. हे पुस्तक शुभदा-सारस्वत प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकात आयुर्वेद, होमिओपॅथी, घरगुती व बाराक्षार या वैद्यकीय चिकित्सा पद्धतीतील विविध आजारांवरील औषधांची माहिती देण्यात आली आहे. अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावे असे वाटते.
या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार प्रवासात कधी ना कधी अपचनाचा त्रास होऊ शकतो. अन्नात झालेला बदल, अनियमित व अवेळी खाणे, मर्यादेपेक्षा अधिक जेवणे यामुळे अजीर्ण, अपचन, पोटदुखी याचा त्रास होतो. त्यावर भास्करलवचूर्ण अर्धा चमचा कोमट पाण्यातून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे किंवा शंखवटीच्या दोन-दोन गोळ्या पाण्याबरोबर घ्याव्यात. पाणी बदलल्याने होमिओ पोडोफायलम् २०० व मर्ककोर २०० यांच्या प्रत्येकी तीन गोळ्या दर तासाला घ्याव्यात. पोटदुखीवर मॅग्नेशिया फॉस २०० या गोळ्या दर दीड तासाने एका वेळी चार या प्रमाणात घ्याव्यात.
उन्हात फिरल्याने ताप आला तर त्रिशूनच्या दोन-दोन गोळ्या गरम पाण्यातून दोन ते तीन वेळा घ्याव्यात. बाराक्षार औषधांचे मिश्रण क्रमांक ११ च्या चार-चार गोळ्या कोमट पाण्यातून तीन ते चार वेळा घ्याव्यात.कफ, सर्दी, खोकला यामुळे डोके दुखत असेल तर त्रिभूवन कीर्तीच्या गोळ्या दोन-दोन गोळ्या कोमट पाण्यातून दिवसातून तीन वेळा घ्याव्यात. सर्दी व खोकला नसून डोके गरम झाले , अंगाची आग होत असेल तर सूतशेखरच्या दोन-दोन गोळ्या तीन तासांच्या अंतराने दुधातून घ्यव्यात. वातज डोकेदुखीमध्ये डोक्यातून कळा येत असतील तर लक्ष्मीविलास रस (नारदीय) वैद्यनाथ १-१ गोळी दूध किंवा पाण्यातून तीन ते चार वेळा घ्यावी.
भर दुपारी उन्हात फिरल्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता असते. कपाळ दुखून ताप भरतो. चेहरा लाल होतो. श्वास घेणे कठीण वाटू लागते. अशा वेळी बाराक्षारच्या नेट्रममूर ३० व काली फॉस ६x च्या शक्तीच्या प्रत्येकी २-२ गोळ्या एकेक तासाने लक्षणे कमी होईपर्यंत घ्याव्यात.
मुका मार लागला तर अर्निका या होमिओपॅथीच्या २०० शक्तीच्या २-२ गोळ्या सकाळी व संध्याकाळी घ्याव्यात. मार लागलेल्या किंवा मुरगळलेल्या ठिकाणी अर्निका मलम चोळून लावावे. जुलाबासाठी संजीवनी गुटी दोन-दोन गोळ्या दिवसातून तीन ेवळा गरम पाण्यातून घ्याव्यात. इलेक्ट्रॉलचे पाणी लगेच घ्यावे.
गुडघे दुखणे, सांधे दुखणे व कंबर ताठणे यासाठी आर कंपाऊंड (अलार्सिन) या कंपनीच्या दोन-दोन गोळ्या गरम पाणी किंवा दुधातून दिवसातून तीन वेळा घ्याव्यात. होमिओपॅथीच्या ह्रसटॉक्स या औषधाच्या २०० शक्तीच्या दोन-दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा घ्याव्यात. पावसात भिजल्याने सर्दी किंवा असह्य डोकेदुखी झाली तर हेपार सल्फ (होमिओपॅथी) १००० व बेलाडोना २०० प्रत्येकी चार-चार गोळ्या चार वेळा घ्याव्यात.
या सर्व औषधांचे प्रमाण मोठी माणसे गृहीत धरून दिलेले आहे. लहान मुलांना कमी मात्रेत द्यायला हरकत नाही. या पैकी कोणत्याही औषधांपासून अपाय होणार नाही. असेही या पुस्तकात सांगण्यात आले आहे. पुस्तकातील ही माहिती सर्वांसाठी नक्कीच उपयुक्त आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचावी, याच उद्देशाने ती येथे दिली आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी हे पुस्तक विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवावे. कोणत्याही मोठ्या पुस्तकांच्या दुकानात किंवा पुस्तक प्रदर्शनातून हे पुस्तक मिळू शकते.
ही सर्व घरगुती आणि अपाय न होणारी औषधे असली तरी कोणाला काही शंका असल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा