रविवार, २४ मे, २००९

दिवस आकाशवाणीचे... (४)

आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागात काम करत असताना पुढे आकाशवाणीवरील अन्य कार्यक्रमातही सहभागी होण्याची संधी मला मिळाली. या सर्व अनुभवातून खूप काही शिकायला मिळाले. नवीन ओळखी झाल्या. अशीच ओळख आजचा प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश देशपांडे याच्याशी आकाशवाणीवरच झाली. एका ऑडिशनसाठी आम्ही आकाशवाणीवरच भेटलो. ओळख झाली. मी तेव्हा मुंबई सकाळमध्ये होतो. आमच्याकडे तेव्हा सर्क्युलेशन/ जाहिरात विभागात एक्झिक्युटीव्हच्या काही जागा भरायच्या होत्या. शिवाजी धुरी हे प्रमुख होते. आकाशवाणीच्या भेटीत राजेशशी गप्पा मारताना तो नोकरीच्या शोधात असल्याचे कळले होते. मी त्याला सकाळाला अर्ज करायला सांगितला. योगायोग किंवा काही म्हणा, राजेशला मुंबई सकाळमध्ये नोकरी मिळाली. अर्थात त्याचे मन फार काळ नोकरीत रमले नाही. आठ-दहा महिन्यांत/वर्षभरात त्याने नोकरी सोडली. पुढे नाटक, सिरियलचे दिग्दर्शन, अभिनय यात त्याने वाहून घेतले. उमेदवारी करत आज त्याने या क्षेत्रात स्वताचे स्वतंत्र अस्तीत्व आणि नाव निर्माण केले. आजचा हा आघाडीचा दिग्दर्शक मित्र मला आकाशवाणीमुळे मिळाला. असेच आणखी एक नाव गीतकार, संवादलेखक गुरु ठाकूर. आकाशवाणीवरील युववाणी कार्यक्रमातील कॉफीहाऊसमध्ये सहभागी होण्याची संधीही मला खूप वेळा मिळाली. या कॉफीहाऊसचे लेखन गुरु ठाकूरचे असायचे. माझी आठवण बरोबर असेल तर एक-दोन कार्यक्रमात तो सहभागीही झाला होता. अर्थात नंतर त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट राहिले नाही.

युववाणीमधील कॉफीहाऊस, कामगार सभेमध्ये एकदा भाषण, युववाणीमध्येच दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागात पहिल्या आलेल्या (नेमके वर्ष आता आठवत नाही) प्रीती आपटे व प्राजक्ता जोशी यांची घेतलेली मुलाखत असे इतरही कार्यक्रम केले. याच वेळी मला आंबटगोड या कार्यक्रमाच्या पाच भागात सहभागी होण्याची संधी मिळाली. अर्थात हे काम मी ऑनररी (मानद सेवा) म्हणून केले होते. पण त्यामुळे मला खूप चांगला अनुभव मिळाला. आकाशवाणीच्या हजारो-लाखो श्रोत्यांपर्यंत शेखर जोशी हे नाव पोहोचले. हे काम मला योगायोगानेच मिळाले.

प्रादेशिक वृत्तविभागात कॅज्युअल न्यूजरिडर म्हणून काम करत असताना एका ड्युटीच्या वेळी आंबटगोड कार्यक्रमाच्या निर्मात्या तनुजा कानडे वृत्तविभागात वृत्तसंपादक हरीश कांबळे यांना भेटायला आल्या होत्या. बोलता बोलता त्या सहज कांबळे यांना म्हणाल्या की, अहो आंबटगोड कार्यक्रमासाठी आम्हाला एक नवा व चांगला मेल व्हॉईस हवा आहे. कोणी आहे का, योगायोगाने मी त्यावेळी ड्युटीवर होतो. कांबळे यांनी मला बोलावले व कानडे बाईंना म्हणाले, अहो हे आमचे शेखर जोशी, कॅज्युअल न्यूज रिडर आहेत. यांना घ्या, त्यांचा आवाज चांगला आहे. तनुजा कानडे यांनी मला एकदा भेटायला यायला सांगितले. माझ्याकडून संहितेतील काही संवाद वाचून घेतले. ओके आहे म्हणाल्या. आता एका भागासाठी तुम्ही सहभागी व्हा, चांगले वाटले तर पुढेही तुम्हालाच घेईन. तसेच याचे कोणतेही मानधन तुम्हाला मिळणार नाही, चालेल ना, असे त्यांनी मला विचारले. माझ्यासाठी ती एक संधी होती, मी हो म्हटले.

आंबटगोड कार्यक्रम म्हणजे आकाशवाणीवरील पुन्हा प्रपंच या गाजलेल्या कार्यक्रमाचे रूप. पुन्हा प्रपंचमध्ये टेकाडे भाऊजी असे पात्र होते. प्रचलित घडामोडींवर संवाद, टीकाटीपणी, चर्चा असे या कार्यक्रमाचे स्वरुप असायचे. विविध मान्यवर लेखक किंवा अन्य मंडळींकडून याची संहिता लिहून घेतली जायची. पंधरा ते वीस मिनिटांचा हा कार्यक्रम असायचा. आंबटगोडमध्ये नवा मेल व्हॉईस घेतल्यानंतर त्या जागी जुन्या भूमिकेतील पात्राचे (भाऊजी) नाव देणे योग्य ठरले नसते. कारण कलावंतच बदलला होता. मग माझे नाव भास्कर भाऊजी असे करण्यात आले. आकाशवाणीवरील ज्येष्ठ निवेदक किशोर सोमण, स्वत तनुजा कानडे आणि नवा मी असे तिघेजण या श्रुतीकेत असायचो. मला आठवताय, पहिल्या भागाच्या रेकॉर्डिंगच्यावेळी मी थोडासा दडपणाखाली होतो. माझ्या बोलण्यात किशोर सोमण व तनुजा कानडे यांच्या सारखी सहजता, उत्स्फुर्तता नव्हती. माझे वाक्य आले की मी म्हणायचो. अंतिम रेकॉर्डिंग करण्यापूर्वी आम्ही तिघानीही एकदा संहिता वाचून घेतली होती. पहिलचे रेकॉर्डिंग चांगले झाले. नंतरच्या एका भागातही मी दडपणाखाली होतो. माझा आवाज कानडे यांना पसंत पडला असावा, आणखी काही भागात मीच भास्कर भाऊजी असणार होतो.

आंबटगोडचे नंतर मी आणखी तीन भाग केले. नंतरच्या सर्व भागांच्या रेकॉर्डिंगच्या वेळी मात्र मी एकदम टेन्शन फ्री होतो. माझे संवाद सहज झाले, काही वेळा मी अॅडिशन्सही घेतल्या. त्या श्रुतिकेमध्येही चपखल बसल्या. हा कार्यक्रम आठवड्यातून एकदा रात्री प्रसारित व्हायचा आणि दुसऱया दिवशी त्याचे पुर्नप्रक्षेपण असायचे.( आता नेमका वार आठवत नाही) कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटी सहभागी कलावंत यात माझे नाव सांगितले जायचे. मला वाटते पाच भागानंतर आकाशवाणीवरीलच अन्य स्टाफ निवेदक त्या कार्यक्रमात सहभागी व्हायला लागला, त्यामुळे पाच भागानंतर मी त्यात नव्हतो. मात्र नंतर अनेक दिवस भास्कर भाऊजी हे नाव मात्र कायम होते. पाच भागांपुरते का होईना पण मला सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे मला खूप काही शिकायला मिळाले, माझ्यासाठी तो अनुभव लाखमोलाचा होता...

असो, आता तूर्तास तरी आकाशवाणीवरील माझे अनुभवाचे हे पुराण आता मी पुरे करतो. पुन्हा कधीतरी आकाशवाणीच्या दिवसांविषयी सांगेन.

३ टिप्पण्या:

  1. joshiji best.. joshi puran band karu naka. surch theva... te puran vatat nahi.. changale anubhav ahet.... thanks.

    vijay holam

    http://policenama.blogspot.com

    उत्तर द्याहटवा
  2. विजय होलम व महेंद्र कुलकर्णी,
    नमस्कार
    आपण वेळोवेळी प्रतिक्रिया व्यक्त करून माझा उत्साह वाढवत असता. आपण सांगितलेली सूचना मी आता अंमलात आणली आहे. पॅरेग्राफ करताना आता डबल स्पेस सोडतो, त्यामुळे आता पॅरेग्राफ वाटतो ना,
    मी जोशीपुराण बंद करत नाहीये, ते सुरुच ठेवणार आहे. जोशीपुराणमध्ये चार भागात जी दिवस आकाशवाणीचे मालिका सुरू केली होती, ती आता थांबवतो, असे मी म्हटले. आकाशवाणीच्या दिवसांविषयी पुन्हा कधीतरी लिहिन.
    आपण वेळोवेळी देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार.
    शेखर जोशी

    उत्तर द्याहटवा