मंगळवार, १९ मे, २००९

काझमींची कसाबगिरी

वकीली व्यवसाय हा खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्याचाच असतो, असे नेहमी बोलले जाते. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील एक प्रमुख आरोपी कसाब याचे वकीलपत्र घेतलेल्या काझमी यांनी सध्या जी काही कसाबगिरी सुरू केली आहे, त्यावरून सर्वसामान्यांच्या मनात वकील आणि या व्यवसायाबाबत असलेला समज ते प्रत्यक्षात खरे करून दाखवत आहेत. न्यायालयीन प्रक्रियेचा एक अपरिहार्य भाग म्हणून आणि कसाब याला वकील दिला नाही तर हा खटला पुढे चालवताच येणार नाही, या गरजेतून काझमी यांना कसाबचे वकीलपत्र दिले गेले आहे. मात्र कसाब हा कसा सज्जनाचा पुतळा आहे, गरीब बिचाऱया कसाबला नाहक या खटल्यात गोवले आहे आणि कसेही करून त्याला यातून आपण बाहेर काढायचेच, या विचाराने काझमी कसाबचा खटला लढवत आहे की काय अशा शंका यावी, असे वर्तन सध्या ते करत आहेत.

खरे तर कसाबचा हा गुन्हा म्हणजे देशाविरुद्धचे युद्ध आहे, कट आहे, असे पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यापासून सर्वानीच मान्य केले आहे. इतके जर आहे तर अपवाद म्हणून कसाबच्या या खटल्यात त्याला वकील न देता शिक्षा सुनावली गेली असती तर काय झाले असते. नाहीतरी येथे जी शिक्षा सुनावली जाईल, त्याच्या विरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, तिथे पुन्हा काही महिने खटला चालेल. या सर्व घोळात कसाब मात्र सरकारी पर्यायाने करदात्या नागरिकांच्या पैशांवर मजा करत राहील.

वकील देण्याच्या बाबतीतही अगोदर घोळ घातला गेला. वाघमारे बाईंची कसाबच्या वकील म्हणून नेमणूक केली गेली होती. परंतु त्यांनी याच खटल्यातील एका आरोपीचे वकीलपत्र घेतल्याची बाब न्यायालयापासून लपवून ठेवली. त्यावर दाद मागितल्यावर न्यायालयाने त्यांना या कामातून मुक्त केले. आणि त्यानंतर या काझमींची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीपासूनच कसाबला निर्दोष ठरविण्यासाठी खऱयाचे खोटे करायला सुरुवात केली.

अगदी सुरुवातीलाच त्यांनी कसाबच्या वयाचा मुद्दा उपिस्थत करून न्यायालयाचा वेळ वाया घालवला. कसाब हा अल्पवयीन असल्याचे सांगून हा खटला बालन्यायालयात चालविण्याचे त्यांचे प्रयत्न होते. कदाचित त्यात ते यशस्वी झाले असते तर बालगुन्हेगार म्हणून त्याला मृत्यूदंडाऐवजी तुलनेत कमी शिक्षा सुनावली गेली असती. कसाबचा अपराध इतका भयंकर आणि सुस्पष्ट आहे, की त्याला या गुन्ह्यासाठी फाशीच दिली गेली पाहिजे. हे होत नाही तर आता काझमी यांनी कसाबला जेव्हा पकडून डॉक्टरांकडे आणले तेव्हाच डॉक्टरांनी त्याला का वाचवले, त्याला न वाचवता मारून का नाही टाकले, म्हणजे जर डॉक्टरांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले तर मी ही माझ्या अशिलाची बाजू मांडण्याचे काम करत आहे.

मुळात काझमी यांनी केलेली ही तुलनाच चुकीची आहे. कोणताही डॉक्टरचे रुग्णाचे प्राण वाचवणे हे आद्य कर्तव्यच असते. मग तो सर्वसामान्य असो, कोणी व्हीआयपी असो वा एखादा गुन्हेगार असो. आता काझमी म्हणतात,त्याप्रमाणे अशिलाला वाचवणे हे त्याच्या वकीलाचे कर्तव्य असते. अन्य कोणत्याही गुन्हयात कदाचित ते (माझ्या दृष्टीने एखाद्या गुन्हेगाराला निर्दोष म्हणून सोडवणे हे चुकीचेच आहे) व्यावसायिक कर्तव्य म्हणून योग्यही असेल. पण या खटल्यात तसे म्हणता येणार नाही.

मुंबईवर आणि निरपराध नागरिकांवर थेट हल्ला चढवणाऱया आणि पोलीस अधिकाऱयांसह निरपऱाध लोकांना गोळ्या घालून ठार मारणाऱया दहा दहशतवाद्यांपैकी कसाब हा जीवंत हाती सापडला आहे. म्हणजे तो गुन्हेगार आहे, भारताविरुद्ध त्याने गुन्हा केला आहे, हे सर्व स्पष्ट असतानाही काझमी कसाबसाठी खऱयाचे खोटे करण्यात आणि त्यातून न्यायालयाचा वेळ वाया घालवण्यात व कसाबला वाचविण्यासाठी इतके आतूर होऊन का प्रयत्न करत आहेत. काझमी हे भारतीय न्यायप्रक्रियेने दिलेले वकील आहेत. तुम्ही भारतीय नागरिक आहात. केवळ अपरिहार्यता म्हणून तुम्हाला कसाबचे वकीलपत्र मिळाले आहे, तुम्ही कसाबसाठी पाकिस्तानचे वकील नाहीत. मग तरीही खऱयाचे खोटे का करायला निघाला आहात. त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे. की कसाबला सोडविण्याची सुपारी तुम्हाला पाकिस्तानने दिली आहे. एकदा याचीही जाहीर उत्तरे द्या.

कसाबचे जे अन्य साथीदार कारवाईत मारले गेले त्यांचे दफन भारतातील कोणत्याही दफनभूमीत करू देणार नाही, असा निर्णय देशातील सर्वच मुस्लिम संघटना व त्यांच्या प्रमुखांनी घेतला. तो योग्यच होता. मात्र आता त्यामुळे पुन्हा करदात्या नागरिकांच्या पैशातून हे मृतदेह जतन करून ठेवण्यासाठी कोही कोटी रुपये खर्च करून शवागृह बांधले गेले आहे. खरे तर अन्य कोणत्याही प्रकरणात काही दिवसांनंतर बेवारस मृतदेहाचे पोलीसांकडून जसे अंत्यसंस्कार केले जातात, तोच न्याय या दहशतवाद्यांच्या बाबतीत लावला गेला पाहिजे. तुम्हाला या दहशतवाद्यांचे हाताचे ठसे, डीएनए आणि अन्य आवश्यक अशा काही गोष्टी पुरावे म्हणून काढून घ्यायच्या असतील, त्या काढून घ्या. पाकिस्तानला एकदा निर्वाणीचा इशारा देऊन ते हे मृतदेह ताब्यात गेत आहेत का ते विचारा, त्यांच्याकडून नकार आला तर इतरांच्या बाबतीत पोलीस जे करतात ,तसेच दहशतवाद्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून टाका, पण आमचे राज्य व केंद्र शासनातील वरिष्ठ, तथाकथीत सर्वपक्षीय पुरोगामी नेते याप्रकरणी मूग गिळून आहेत. आणखी किती दिवस हे मृतदेह जतन करून ठेवणार आहात.

हे सर्व कमी की काय म्हणून आता काझमी यांनी आपल्या अकलेचे नवे तारे तोडले आहेत. कसाबच्या गोळ्या अंगावर झेलत ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि ज्यांच्यामुळे कसाब जीवंत हाती सापडला, ते तुकाराम ओंबाळे हे पोलीस अधिकारी त्या वेळी तीथे नव्हतेच, असे अजब तर्कट काझमी यांनी मांडले आहे. तसेच इस्लामिक जिमखान्याने त्यांचे सदस्यत्व रद्द केले म्हणून त्यांच्यावरही ते आगपाखड करत आहेत. आता तर कसाबला फाशीची शिक्षा न होता, त्याला सुधारण्याची संधी द्यावी, असा मुद्दा काझमी यांनी मांडला आहे. एकंदरीतच काझमी यांचे हे जे काही बेजबाबदार वर्तन सुरू आहे, त्यामुळे एकदा न्यायाधीशही संतापले होते व त्यांनी तुम्हाला काम करायचे नसेल तर बाजूला व्हा, असे काझमी यांना सुनावले होते. मात्र नंतर त्यात मार्ग काढला गेला. ही सुद्धा खटला लांबविण्याची काझमी यांची वेगळी चाल असू शकते. तसे झाले तर पुन्हा नवीन वकील नेमणे, अन्य प्रक्रिया आणि पुन्हा सुरुवातीपासून सगळे सुरू, हे करण्यात वेळ वाया जाऊ शकतो.

भारतीय न्यायालयीन प्रक्रियेचा अपरीहार्य भाग म्हणून तुमची नियुक्ती करण्यात आली आहे, तुम्ही पाकिस्तानने नेमलेले किंवा कसाबने नेमलेले वकील नाही. त्यामुळे उगाचच खऱयाचे खोटे करून किंवा न्यायालयाचा वेळ वाया घालवून खटला लांबवण्याचा प्रयत्न करू नका. तसे केले तर शेवटी वकील न देता आम्हाला हा खटला पुढे चालवावा लागेल, असा सडेतोड व निर्वाणीचा इशारा काझमी यांना न्यायाधीशांनी द्यावा.

तरीही काझमी सुधारले नाहीत, तर राष्ट्रप्रेमी नागरिकच त्यांना माफ करणार नाहीत आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त रोषाला त्यांना सामारे जावे लागेल. तो रोष कसा असेल व कशा प्रकारे प्रगट होईल हे येणारा काळच ठरवेल...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा